राष्ट्रपतींचे गौरवोद्गार देशाचा झिरो माईल असलेल्या नागपुरात देशाचे विकास केंद्र होण्याची क्षमता असून शिक्षण व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही या शहराचा वेगाने विकास होत आहे, असे गौरवोद्गार नागपूर शहरासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. नागपूर महापालिकेने रेशीमबागेत कविवर्य सुरेश भट स्मृती सांस्कृतिक सभागृह बांधले आहे. त्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी नागपुरातील साहित्यिक, सांस्कृतिक वारसाबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नंदा जिचकार होत्या. प्रारंभी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शाल, तुळशीचे रोप, स्मृतिचिन्ह देऊन महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. नागपुरात अत्याधुनिक पायाभूत सुविधा वेगाने विकास केल्या जात आहेत. नागपूर ही गडकरी आणि फडणवीस या प्रखर राजकीय पुढाऱ्यांची भूमी आहे. त्यांनी या शहराच्या विकासाला नवीन दिशा आणि गती दिली आहे. नागपूरला स्मार्ट सिटी बनवण्याची योजना आहे. युनिसेफच्या सर्वेक्षणाचा हवाला देऊन नागपूर हे महाराष्ट्रातील इतर शहरांपेक्षा साक्षरतेत पुढे असल्याचे त्यांनी सांगितले. युनिसेफच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि औरंगाबाद शहरापेक्षा नागपुरात सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण ९२ टक्के आहे. नागपूर जिल्हा राज्यातील सर्वात साक्षर जिल्हा झाला आहे. हे शहर देशाच्या विकासात भरपूर योगदान देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कविवर्य सुरेश भट यांची स्मृती चिरंतर राहावी या दृष्टीने हे सांस्कृतिक सभागृह साऱ्या देशात उत्कृष्ट ठरावे. यासाठी आपण अनेक वर्षांपासून प्रयत्नरत होतो. आज स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. हे सभागृह म्हणजे कलाकृतीच आहे, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. प्रास्तविक करताना नंदा जिचकार यांनी सांगितले की, नागपूरला हरित शहर बनवण्याच्या संकल्पाकडे वाटचाल सुरू असून कविवर्य सुरेश भट हे सभागृह नागपूरच्या इतिहासातील गौरवाची बाब आहे. हे सभागृह बांधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सहकार्य लाभले. महापालिका आयुक्त अश्विन मुद्गल यांनी आभार मानले. क्षणचित्रे मुख्यंत्र्यांनी सुरेश भट यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांच्या अमरावतीतील एका भेटीचा किस्साही त्यांनी सांगितला. मामांनी त्यांना ‘हा गंगाधरावांचा मुलगा आहे’ असे सांगितले. त्यावर सुरेश भट लगेच म्हणाले ‘तू कृष्ण आहे’, मी त्यांना कसे काय विचारले तर ते म्हणाले. ‘तुझा मामा कंस आह’ असे उत्तर दिले.अतिशय दिलखुलास, वऱ्हाडी भाषेत सांगायचे झाले तर ते ‘बडे दिलवाले’ होते, असे मुख्यमंत्री म्हणाले सुरेश भट यांची स्मृती निमित्त महापालिकेने बांधलेले सभागृह दर्जेदार आणि अपेक्षेपेक्षा चांगले आहे. त्यामुळे आम्हा भट कुटुंबाला आनंद आहे. सुरेश भटांवर अख्य़ा महाराष्ट्राने प्रेम केले आहे, असे सुरेश भट यांचे पुत्र चित्तरंजन भट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सभागृह परिसरात सुरेश भट यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. राष्ट्रपतींनी रिमोटव्दारे त्याचे लोकार्पण केले. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जहो खरेच धन्य ऐकतो मराठी’ या कविवर्य सुरेश भट यांच्या गीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. लोकार्पण कार्यक्रम लोकांना पाहता यावा म्हणून रेशीमबाग मैदानात एलएडी स्क्रीन लावण्यात आले होते. वायुसेनेच्या बँड पथकाने राष्ट्रपतीचे आगमनाच्यावेळी राष्ट्रगीत सादर केले. नियोजित वेळेनुसार सव्वाचार वाजता सुरू होणारा कार्यक्रम पावणे पाचला सुरू झाला आणि ४५ मिनिटात संपला. उद्घाटनानंतर बाहेर असलेल्या लोकांनी सभागृह पाहण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे आतमधील व्यवस्था खोळंबली. कविवर्य सुरेश भट हे मराठातील गझल सम्राट होते. त्यांना बालपणीच उजव्या पायाला पोलिओ झाला. ते जीवनभर अपंग राहिले. परंतु यावर या प्रतिभावंत साहित्याकाने मात करीत अमाप लोकप्रियता मिळवली. ही त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्ट आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या या सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण करताना अत्यंत आनंद होत आहे. - रामनाथ कोविंद, राष्ट्रपती