राज्यात शेतकरी आत्महत्या, तूर खरेदीचा तिढा, पाणी टंचाई, महागाई यासारखे अनेक प्रश्न सध्या अग्रस्थानी असतानाच्या पाश्र्वभूमीवर उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शाही षष्ठय़ब्दीपूर्ती सोहळा नागपुरातील कस्तुरचंद प्रांगणावर सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील शेकडो व्हीव्हीआयपी सहभागी होणार आहेत. संघ संस्कारात कुठल्याही बडेजावपणाला स्थान नाही, फक्त काम करीत राहणे ही या संस्काराची प्रमुख शिकवण आहे. गडकरी यांची राजकीय वाटचाल याच शिकवणीतून झाली आहे. मात्र त्यांच्या सत्कार सोहोळ्याला आयोजकांनी एका मेगाईव्हेंटचे स्वरूप दिले आहे. विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ते सुद्धा स्वयंसेवक आहेत)यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला असून ते आयोजकाच्या भूमिकेत आहेत. यासाठी कस्तुरचंद पटांगणावर किमान ५० हजार लोक बसू शकतील इतकी व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमात गडकरींना एक कोटींची थैली अर्पण करण्यात येणार आहे. यावर काही टीका होऊ नये म्हणून ही रक्कम सामाजिक संस्थांना दान करण्याचा निर्णय गडकरी यांनी आधीच जाहीर केला आहे. कार्यक्रमाला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रातील मंत्री, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील भाजपचे सदस्य, शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह मित्रपक्षाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. विदर्भवाद्यांचे लक्ष नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही नेते विदर्भवादी आहेत. कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. गडकरी-फडणवीस यांनी वैदर्भीयांना स्वतंत्र राज्याचे आश्वासन दिले आहे, मात्र दिल्लीचा त्याला विरोध आहे. गडकरींच्या सत्काराच्या निमित्ताने या मुद्यावर ही सर्व नेतेमंडळी काय भूमिका घेतात, याकडे विदर्भवाद्यांचे लक्ष लागले आहे.