राजकीय पाठबळामुळेच कारवाई नाही एका खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही सोनेगाव पोलिसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मुन्ना यादव यांच्यावर कारवाई केली नाही. राजकीय पाठबळामुळेच मुन्ना यादव यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली नाही, अशी चर्चा पोलीस वर्तुळात आहे, परंतु त्यासाठी सोनेगाव पोलीस अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सूरज लोलगे याच्या तक्रारीवर हा गुन्हा दाखल झाला. मुन्ना यादव आणि सूरज लोलगे हे दोघेही गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे आहेत. काही वर्षांपूर्वी लोलगे हा मुन्ना यादवसोबत काम करीत होता, परंतु त्यांचे बिनसले आणि लोलगेने मुन्ना यादव यांची साथ सोडली. त्यानंतर लोलगे हा स्वतंत्र काम करू लागला. मात्र, दोघांचेही कार्यक्षेत्र एकच असल्याने त्यांच्यात धुमसत होते. दरम्यान, सोनगाव परिसरातील एका भूखंडावरून लोलगे याचा राहुल धोटे व मनीष गुडधे यांच्याशी वाद सुरू होता. त्यावेळी धोटे आणि गुडधे यांनी मुन्ना यादव यांच्याशी संपर्क केला. त्यावर मुन्ना यादव आणि त्याचा भाऊ बाला यादव यांनी लोलगे यांना भ्रमणध्वनी करून शिवीगाळ केली. तसेच त्या भूखंडावर सुरक्षा भिंत उभारण्याकरिता व पोलिसांचा ससेमिरा सांभाळण्याकरिता २२ लाखांची खंडणी मागितली. लोलगे हा हुशार असल्याने त्याने सर्व संभाषण रेकॉर्ड केले. या संभाषणाची ऑडिओ सीडी तयार केली आणि त्यानंतर ४ जुलै २०१५ आणि ६ जुलै २०१५ ला सोनगाव पोलिसात तक्रार दिली. सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. मात्र, प्रकरणाचा तपासच केला नाही. त्यामुळे लोलगेने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी भ्रमणध्वनीवरील आवाजाची शहानिशा करण्यासाठी मुन्ना यादव आणि बाला यादव यांच्या आवाजाचे नमुने घेण्यास सांगितले. मात्र, त्यातही पोलीस कुचकामी ठरले. हा प्रकार जेव्हा न्यायालयाच्या लक्षात आला तेव्हा न्यायालयाने पोलीस यंत्रणेला खडसावले. गृह सचिवांना पोलीस आयुक्त, सोनेगाव पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश दिले, तर न्यायालयानेही त्यांच्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी स्पष्टीकरण मागितले. या घटनाक्रमात पोलिसांनी राजकीय पाठबळामुळेच यादवांविरुद्ध कारवाई केली नसावी, अशी शक्यता आहे. मात्र पोलीस आयुक्तांना स्वत:ला वाचविण्यासाठी सोनेगाव पोलिसांवर खापर फोडावे लागेल. त्यामुळे सोनेगाव पोलीस अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रकरणातही पोलिसांचे संरक्षण मुन्ना यादव यांच्या मुलगाही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत. महाविद्यालय आणि वस्तीतील मुलांना मारहाण करण्यात त्याचा हातखंडा आहे. डॉ. आंबेडकर महाविद्यालयासमोर मारहाण करणे, वस्तीतील एकाचे अपहरण करून मारहाण करणे असो किंवा माटे चौकात एका बिल्डरच्या मुलास मारहाण करण्याचा प्रकार असो या प्रकरणांमध्ये त्यांच्या मुलांची नावे आली, परंतु पोलिसांनी सर्व ठिकाणी अदखलपात्र गुन्हा दाखल करून तडजोड केली. या सर्व बाबींवरून यादव यांच्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी पोलीस विभागावर दबाव टाकण्यात येत असल्याचे स्पष्ट होते.