मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी’ व्याख्यानात गिरीश कुबेर यांचे प्रतिपादन ‘कथा अकलेच्या कायद्याची’ पुस्तकाचे प्रकाशन मराठी भाषा ही श्रीमंतच आहे. अभिव्यक्त होताना केली जाणारी मांडणी महत्त्वाची आहे. मजकुरात सत्त्व असल्यास भाषेच्या मर्यादाही सहज तोडता येतात. प्रश्न सकस मजकूर निर्मिती क्षमतेचा आहे. ही क्षमता नसेल तर भाषेला दोष देणे योग्य नाही. दारिद्रय़ भाषेचे नव्हे, तर मराठी भाषिकांचे आहे. मराठी ही ज्ञानभाषा असण्यावर साशंकता व्यक्त करणेही चुकीचे आहे. उलट ती समजून घेण्यात आपलीच झेप कमी पडत आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेच्या वतीने रविवारी आयोजित कार्यक्रमात बौद्धिक संपदा कायद्याचे विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या डॉ. मृदुला बेळे लिखित ‘कथा अकलेच्या कायद्याची’ या पुस्तकाचे प्रकाशन कुबेर यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. येथील गंगापूर रस्त्यावरील शंकराचार्य न्यास संकुलातील कुर्तकोटी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे, परिषदेचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, अॅड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते. कुबेर यांनी मराठी ही ज्ञानभाषाच असल्याचे नमूद करत तिला ज्ञानभाषा करण्याचा प्रश्न पडणाऱ्यांना फटकारले. मराठी भाषेची समृद्ध परंपरा मांडताना त्या त्या कालखंडात भाषेविषयी कसे मोठे काम झाले याचे दाखलेही त्यांनी दिले. कालसुसंगतता हा मराठी वाङ्मयातील महत्त्वाचा भाग आहे. जागतिक व्यवस्थेचा भान असणारी मराठी माणसे होती. आपल्या लोकांना ते समजावून सांगण्याची त्यांची प्रेरणा होती. मराठी भाषेविषयीची बांधिलकी जोपासण्यासाठी मजकूर निर्मितीची क्षमता वृद्धिंगत होणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात भाषेतील सत्त्व आपण घालवून बसलोय. आपल्याच भाषेविषयी न्यूनगंड बाळगत तिला मर्यादा घातल्या आहेत. पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना टाकण्याचा आटापिटा सुरू असतो. यातून केवळ बौद्धिकदृष्टय़ा उनाड पिढी तयार करण्याचे काम होत आहे. वास्तविक मातृभाषा चांगली येत नसेल तर दुसऱ्या कोणत्याही भाषेवर प्रभुत्व मिळवता येत नाही. मातृभाषेचा अर्थव्यवस्थेशी संबंध असतो. भाषेकडे दुर्लक्ष झाल्यास नकळत त्याचा अर्थ व्यवहारांवरही परिणाम होतो. मराठीतील ऐतिहासिक घटनांशी संबंधित साहित्याचे दस्तावेजीकरण करण्यातही आपल्याला रस नसल्याकडे कुबेर यांनी लक्ष वेधले. या वेळी डॉ. बोरसे यांनी बौद्धिक संपदा कायद्याचे विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या डॉ. बेळे यांचे ‘लोकसत्ता’तील ‘कथा अकलेच्या कायद्याची’ हे सदर पुस्तकरूपाने वाचकांच्या भेटीस आल्याचे सांगून हे अतिशय वेगळ्या विषयावरील पुस्तक असल्याचे नमूद केले. अतिशय क्लिष्ट विषय रंजक व सुबोधपणे समजेल अशा पद्धतीने लेखिकेने मांडल्याचे सांगितले. डॉ. बेळे यांनी त्यांचा एका लेखापासून लेखिकेपर्यंतचा झालेला प्रवास उलगडून दाखविला. स्वामित्व हक्काचे प्रकार, स्वाधीन हक्क स्थानिक असतात. जागतिक पातळीवर तो मिळत नाही अशा अनेक बाबींवर सर्वसामान्य अनभिज्ञ असतात. हे कुतूहल पुस्तकाद्वारे शमण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. आभार परिषदेचे कार्यवाह रवींद्र मालुंजकर यांनी मानले.