जलजागृती सप्ताहात जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांचे प्रतिपादन; पाणी अडविण्याच्या उपक्रमामध्ये अनेक घटकांचा समावेश भविष्यात पाणी टंचाईचा धोका टाळण्यासाठी जलसाक्षरता आणि जल व्यवस्थापनावर अधिक भर देणे गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केले. महाकवी कालिदास कला मंदिर येथे जलजागृती सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता सुभाष वाघमारे, अधिक्षक अभियंता राजेश मोरे, आदी उपस्थित होते. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी पुरविण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्याची गरज आहे. पावसाळ्यातील पाणी अधिकाधिक प्रमाणात अडविणे आणि जिरविणे यासाठी काम करताना जलपुनर्भरण मोहीम हाती घेण्याची गरज आहे. पाण्याचे साठे वाढवण्यासाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून नदी, नाले आणि धरणातून गाळ काढण्याचे तसेच पाणी अडविण्याचे उपक्रम मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी विविध घटकांचा मोठय़ा प्रमाणावर सहभाग मिळाला असल्याचे राधाकृष्णन यांनी सांगितले. जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने ‘सांडपाण्याचा पुनर्वापर’ ही संकल्पना जनमानसात बिंबवण्याचा विभागाने प्रयत्न केल्याचे मुख्य अभियंता वाघमारे यांनी सांगितले. जलदिनानिमित्त काव्य, वक्तृत्व, गीत, पथनाटय़ आदी विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. दिलीप काळे यांनी सहकाऱ्यांसह ‘सेव्ह वॉटर, सेव्ह लाइफ’ हा मूक अभिनयाचा प्रयोग सादर केला. त्यातून पाण्याचे महत्व मांडण्यात आले. विश्वनाथ डवरे यांनी कीर्तन, संदीप गायकवाड यांनी ‘पाणी हरवलं’ हे लघुनाटय़, श्रुती बोरस्ते यांनी व्याख्यान, कडा कार्यालयाच्या नमिता हेमडे व सहकाऱ्यांनी पथनाटय़, शिल्पा हासे यांनी प्रदुषणावर नदीचे मनोगत हे एकपात्री व सीडीओ मेरी महिला मंडळाच्या सदस्यांनी ‘पाणी बचतीचा मंत्र खास’ हे लघु नाटय़ आदी कार्यक्रम सादर केले. जलदिंडीद्वारे जनजागृती जलजागृती सप्ताहानिमित्त आयोजित जलदिंडीचे उद्घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते झाले. त्र्यंबक रोडवरील जलसिंचन भवन येथून फेरीला सुरूवात झाली. त्र्यंबक रस्ता, पिनॅकल मॉल, कान्हेरेवाडी येथून महाकवी कालिदास कला मंदिर येथे दिंडीचा समारोप झाला.