गोव्याच्या धर्तीवर करंजा-रेवस रो रो सेवा रायगड जिल्ह्य़ाची राजधानी असलेला अलिबाग तालुका व उरण यांच्यामधील करंजा ते रेवस या दोन बंदरांतील सागरी (जलप्रवासाचे)अंतर केवळ पंधरा मिनिटाचे असून या खाडीवर करंजा-रेवस पूल उभारण्याचा प्रस्ताव ३३ वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांनी करंजा ते रेवसदरम्यानच्या पुलाची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून करंजा ते रेवस खाडी पुलाकरिता साडेतीनशे कोटी रुपयांची तरतूद केल्याने उरण तालुक्याच्या विकासाला चालना देणाऱ्या खाडी पुलाचे स्वागत करण्यात आले होते. निर्मितीमुळे उरण तसेच अलिबागमधील जनतेची प्रतीक्षा संपणार होती. तसेच अलिबाग, मुंबई, उरण ते अलिबाग अंतर कमी झाल्याने पैसा व वेळेचीही बचत होणार आहे. मात्र या पुलाचा अजूनही प्राथमिक सव्र्हे सुरू आहे. त्यामुळे पूल उभारण्यासाठी सात ते आठ वर्षे लागणार आहेत. या पुलाला पर्याय म्हणून महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून दहा कोटींच्या निधीतून करंजा ते रेवस दरम्यान रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्य़ातील उरण तालुका हा मुंबईच्या शेजारी असला तरी उरणमधून पुढील प्रवास करण्यासाठी येथील नागरिक व प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अलिबाग या जिल्ह्य़ाच्या प्रमुख ठिकाणी कामानिमित्ताने जाण्यासाठी करंजा-रेवस खाडी पार करावी लागते. खाडीपार करण्यासाठी पंधरा मिनिटे लागत असली तरी या मार्गावरील जलप्रवास धोकादायकच आहे. या मार्गावर अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे करंजा-रेवस खाडीवर पूल उभारण्याची मागणी दोन्ही तालुक्यांतील नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहेत. तर अलिबागच्या नागरिकांना रस्त्याच्या मार्गाने मुंबईला जाण्यासाठी अलिबाग, पेण व पनवेल असा ७० किलो मीटरचा प्रवास करावा लागतो. तर उरणमधील नागरिकांना पेण ते अलिबाग असा चाळीस ते पन्नास किलोमीटरचे अंतर कापावे लागत आहे. त्यासाठी एमएमआरडीएने या पुलाचा प्रस्ताव मांडला आहे. पुलाच्या कामासाठी प्राथमिक सव्र्हे सुरू आहे. या कामालाच नियमित पाठपुरावा होऊन पर्यावरणीय तसेच इतर सर्व परवानग्या मिळाल्या तरी सात ते आठ वर्षे लागणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून करंजा ते रेवस दरम्यान रो रो सेवा सुरू करण्यात येत आहे. या कामाला करंजा बंदरातून सुरुवात झाली आहे. हे काम २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अभियंता सुधीर देवरे यांनी दिली.