रस्त्यात मंडप टाकून सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरे करणाऱ्या उत्सवी मंडळांना मुंंबई उच्च न्यायालयाने चाप लावल्यानंतर जागेसाठी गणेशोत्सव मंडळांना दाहिदिशा फिरावे  लागत आहे. नवी मुंबईतील १२ मंडळांना गणेशोत्सव कुठे साजरा करायचा असा प्रश्न पडला आहे. वाशी येथील एका ३१ वर्षे जून्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गतवर्षी देण्यात आलेली जागाही यावर्षी नाकारण्यात आल्याने तिसऱ्या जागेचा या मंडळाने शोध सुरु केला आहे.

रस्ते अडवून सार्वजनिक उत्सव साजऱ्या करणाऱ्या उत्साही मंडळांना मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्याची अंमलबजावणी स्थानिक प्राधिकरणे काठेकोरपणे करीत असून नवी मुंबई पालिकेने तर रस्तावर किंवा रस्तच्या आजूबाजूला गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे अनेक मंडळांची पंचाईत झाली असून शेवटच्या क्षणी रस्ता मुक्त जागेचा शोध सुरु झाला आहे. वाशी प्रभाग ६२ च्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती दहावी बारावी बोर्डाच्या जवळील मोकळ्य जागेत साजरा केला जात होता मात्र ही जागाही अंर्तगत रस्तात येत असल्याने गतवर्षी पालिकने त्याला परवानगी नाकारली होती. त्यावेळी मंडळाच्या विनंतीवरुन वाशी विष्णूदास भावे मागील गेट जवळ जागा देण्यात आली. त्यासाठी पालिकेने या जागेचे रीतसर भुईभाडेही घेतले होते.

यंदा ही जागाही नाकारण्यात आली असून आता तिसऱ्या जागेचा शोध मंडळाचे कार्यकर्ते घेत आहेत. हीच स्थिती नेरुळ मधील सीवूड उड्डाणपूलाच्या खाली साजरा होणाऱ्या मंडळाची झाली असून त्यांचाही नवीन जागेचा शोध सुरू झाला आहे. वाशी येथील राजा गणपती ओळखल्या जाणारा नगरसेवक संपत शेवाळे यांच्या गणरायाला शेजारच्या उद्यानाचा आधार घ्यावा लागला आहे. अशी १२ मंडळांची शेवटच्या क्षणी धावपळ सुरू झाली असून काही अस्वच्छ, कचराकुंडय़ा असलेल्या जागा स्वच्छ करून घेण्याकडे मंडळांचा कल आहे.

पालिकेच्या या कडक धोरणामुळे शहरात एकही रस्त्यावर गणेशोत्सव साजरा होणार नाही याकडे लक्ष दिले जात आहे. ग्रामीण आणि झोपडपट्टी भागात मात्र मोकळ्या जागाच नसल्याने हे गणेशोत्सव परवानगी न घेता साजरे केले जाणार असल्याचे दिसून येते.