तरीही आत्मपरीक्षणाची गरज, पंचायत समितीत मात्र काठावर पास भाजपाला केवळ दोन जागा

भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या पनवेलमध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापने आपला गड राखला. भाजपला आणखी संघर्ष करण्याची आवश्यकता असल्याचा संदेश या निवडणुकीतून मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उलवा येथे जाहीर सभा घेऊनही भाजपला गव्हाण मतदारसंघ राखता आला नाही, तर काँग्रेसने तीन जागा जिंकत पंचायत समितीत केलेला प्रवेश अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे. त्यामुळे शेकापला आहे ते राखण्याची गरज आहे तर भाजपला अस्तित्व सिद्ध करण्यासाठी संघर्षांशिवाय पर्याय नाही.

रायगड जिल्हा परिषदेसाठी पनवेल तालुक्यात झालेल्या मतदानात शेकापने दोन्ही ठिकाणी आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८ जागांपैकी शेकापने ६ खिशात घातल्या असून भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. पंचायत समितीच्या १६ जागांवर भाजपने शेकापला चांगलीच टक्कर दिली असून ६ जागांवर विजय मिळवला आहे, तर शेकापला ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या दोन पक्षांतील संघर्षांत काँग्रेसने तीन जागा खिशात टाकत आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. शिवाय पंचायत समितीमध्ये तीन जागांच्या बळावर काँग्रेस निर्णायक ठरणार आहे. शेकाप काँग्रेसला जवळ करणार आहे. राज्यातील कानाकोपऱ्यात कितीही स्थित्यंतरे झाली तरी रायगड जिल्हा म्हणजे शेकापचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र त्याला आता सुरुंग लागल्याचे चित्र आहे. कधीकाळी शेकापमध्ये असलेले ठाकूर कुटुंब प्रथम काँग्रेस नंतर भाजपमध्ये डेरेदाखल झाल्याने रायगडमधील शेकापच्या कार्यकर्त्यांचा कल भाजपकडे वळू लागला आहे. त्यामुळे जिल्हा व पंचायत समितीत आता शेकापला भाजपच्या रूपात चांगला प्रतिस्पर्धी मिळाला आहे.

भविष्यात पक्ष निदान रायगडपुरता तरी राखून ठेवण्याची मोठी जबाबदारी शेकापच्या नेतृत्वावर आहे. भाजपचा चंचूप्रवेश होऊ लागला असून, पनवेल महापालिकेच्या निमित्ताने या पक्षाचा खरा कस लागणार आहे. पनवेलमधील शहरी व ग्रामीण भागाचे राजकरण पूर्णपणे वेगळे असले तरी उलव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊनही गव्हाण जिल्हा परिषद भाजपला खेचून आणता आली नाही. रामशेठ ठाकूर यांची बहीण रत्नप्रभा घरत यांचा गव्हाणमध्ये निसटता विजय झाला. तो ठाकूर कुटुंबीयांना भूषणावह नाही. त्यामुळे येत्या काही महिन्यांत होणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपने मतदारांना गृहीत धरून चालणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. पनवेलमधील राजकारण हे शेकाप व भाजपमध्ये सुरू असले तरी त्याला पाटील व ठाकूर कुटुंबाच्या संघर्षांची किनार आहे. त्यामुळे पक्ष कोणताही असो पाटील व ठाकूर कुटुंबांचा या निवडणुकीत कस लागला हे निश्चित!

पनवेल

जिल्हा परिषद

शेकाप  ०६

भाजप ०२

पंचायत समिती

शेकाप  ०७

भाजप  ०६

काँग्रेस ०३