शुद्ध तूप हा प्राणीजन्य पदार्थ आहे. यात वनस्पती तूपचा समावेश होत नाही. दूध हा नाशवंत पदार्थ आहे, पण त्यापासून बनवलेला शुद्ध तूप हा टिकाऊ पदार्थ आहे. बाजारातून आणलेल्या शुद्ध तुपाला घरच्या तुपासारखा वास नसतो. सायीसकट कोमट दुधास विरजण लावून त्याचे दही झाल्यावर ते घुसळून वर तरंगत असलेले लोणी बाजूला काढून ते कढवितात म्हणजे उष्णता देतात. योग्य उष्णता मिळाल्यानंतर लोण्यातील पाण्याचा अंश बाष्परूपात निघून जातो, वर बुडबुडय़ाच्या स्वरूपात दुधातील काही पदार्थ वर येतात. नंतर हे तरंगणारे पदार्थ तळाशी बेरीच्या स्वरूपात जमा होतात आणि वरती पारदर्शक तूप तयार होते. तूप कढविण्यासाठी लागणारे तापमान ८० ते १२५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. ११५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानास कढविलेल्या तुपाला करपट वास येतो. १२० अंश सेल्सिअस तापमानाला अगदी थोडा वेळ लोणी कढविल्यास तुपातील कॅरोटीन व अ जीवनसत्त्व नाश पावत नाहीत आणि तूप रवाळ होण्यास काही व्यत्यय येत नाही. कढवताना अमिनो आम्ले व शर्करा यांची मायलार्ड प्रक्रिया होऊन तुपाला सोनेरी रंग आणि खमंग वास येतो. सायीच्या दह्य़ापासून केलेल्या लोण्यात लॅक्टिक आम्लाची चव असल्याने ती चव तुपालाही येते. त्यामुळे हे तूप जास्त चविष्ट व खमंग लागते. आंबूस वास यावयास कारणीभूत असलेले मेदाम्लाचे रेणू सुटण्यासाठी त्यांची पाण्याबरोबर क्रिया व्हावी लागते आणि कढवण्याच्या क्रियेमध्ये सर्व पाणी नष्ट झालेले असल्याने तूप खराब होत नाही. सहा महिनेसुद्धा ते उत्तम स्थितीत राहू शकते.गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांच्या दुधापासून तूप बनवितात. बाजारात मिळत असलेले हवाबंद तूप हे वरीलप्रमाणे संस्कारित नसते. दूध घुसळून वर आलेल्या क्रीमपासून तूप बनवितात. त्यामुळेच या तुपाला घरच्या तुपाचा खमंग वास नसतो. तुपात संपृक्त मेदाम्लाचे प्रमाण प्रचंड असते. कबरेदके व प्रथिने अजिबात नसतात. काही प्रमाणात जीवनसत्व अ, ड, इ, के तसेच बीटा कॅरोटीन, लिनेरीक आम्ल आणि ओमेगा ३, ओमेगा ६ ही स्निग्धाम्ले असतात जी शरीराला फायदेशीर असतात.प्रबोधन पर्व: डॉ. पंजाबराव देशमुख -शोषितांचे उद्धारकत्रे आणि शेतकऱ्यांचे कैवारीबहुजनांच्या शिक्षणाचे शिल्पकार आणि कृषिक्रांतीचे अग्रदूत म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख. पंजाबरावांचे माध्यमिक शिक्षण (कारंजा) लाड येथे, तर शालान्त परीक्षेचे शिक्षण अमरावतीच्या िहदू हायस्कूलमधून पूर्ण झाले. पुण्याच्या फग्र्युसन कॉलेजमधून इंटरमिडीएटचे शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी पंजाबराव इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी ‘वेद वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’ (१९२०)मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी संपादन केली. पुढे ते बॅरिस्टर झाले. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रकांडपांडित्य संपादन करणारे पंजाबराव कधीच पोथीनिष्ठ नव्हते, तर ते होते कृतीनिष्ठ. बहुजनांचे दु:ख व अन्याय दूर करण्यासाठी ते सतत झगडत. महाराष्ट्राच्या शिक्षणाचे पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील हे दोन शिल्पकार. देशातील सर्वात मोठय़ा श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना पंजाबराव यांनी १९३१ मध्ये अमरावती येथे केली. यानंतर विदर्भाचा शैक्षणिक विकास, भारतीय शेती, शेतकरी आणि बहुजन उद्धाराची चळवळ हे त्यांच्या जीवनाचे ध्येय ठरले. बहुजनांच्या शिक्षणातील अडचण दूर करण्यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. शोषितांचे उद्धारकत्रे आणि शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या पंजाबराव यांनी ‘जगातील शेतकऱ्यांनो संघटित व्हा’ हा मंत्र दिला. ते कृषी विद्यापीठाच्या कल्पनेचे जनक आहेत. शिक्षण, शेती, सहकार, अस्पृश्योद्धार, जातीभेद निर्मूलन, धर्म इ.विविध क्षेत्रांत त्यांनी प्रचंड कार्य केले. ग्रामीण समाज पोथीनिष्ठ आणि परंपरानिष्ठ असल्याने त्यांच्यात अज्ञान, अंधश्रद्धा, दैववाद, अवैज्ञानिकता, देवभोळेपणा खच्चून भरल्यामुळेच तो शिक्षणापासून वंचित राहिला, असे त्यांचे मत होते. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्यासोबत १९२७ मध्ये अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. मंदिर प्रवेशामागे ईश्वर भक्तीचा त्यांचा उद्देश नव्हता. पंजाबरावांचा देवावर विश्वासच नव्हता. ते म्हणत, ‘मूर्तीत देव असेल तर मूर्तीत देव घडविणारा कारागीर हा देवाचा बापच ठरेल.’ आजही पंजाबराव यांचे कार्य शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक, संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञांना तसेच बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे. मनमोराचा पिसारा: जीवन ऐसे नावत्याच्या आवाजाची चाहूल डोंगरावरची ‘घाटी’ चढता-उतरता लागली होती. जवळ आल्यावर त्या आवाजातली घनगंभीरता अधिक जाणवू लागली. देवळाच्या देवडीवरून आत शिरल्यावर तर तो आवाज सर्वागाला लपेटतोय असं वाटलं. देऊळ जुन्या पद्धतीचं, कोकणातलं तसं नावाजलेलं, पण लहान चणीचं. आयताकृती गाभारा, घोटीव आकाराचे लाकडी खांब आणि आत गाभारा. समईच्या प्रकाशात शांतपणे तेजाळलेलं शिवलिंग. देवळाचा पसारा तो इतकाच. पण त्या अवघ्या परिसराला देवळामागच्या धबधब्याच्या आवाजानं घेरलं होतं. आजूबाजूला दाट झाडी, पावसानं धुऊन निघालेली तेजस्वी पानं, पाण्याच्या तुषारानं सारा आसमंत धुकाळलेला.धबधब्याचा अखंड झोत काळ्या खडकावरून कोसळत होता. गंमत म्हणजे धबधब्याचा जलप्रवाह वेगानं धावत आणखी एका कडय़ावरून उडय़ा मारत होता. धबधब्याला विशेष उंची वगैरे नव्हती, अबलखपणे दुडदुडत धावणाऱ्या वांड मुलासारख्या त्याच्या झेपा होत्या. हिरव्यागार पाचूसारख्या गर्द रानात चपखलपणे शुभ्र ओघवत्या स्फटिकासारखा हा धबधबा. नितळ, स्वच्छ पाण्याचा ओघ पाहून मन आपोआप प्रवाही झालं.धबधब्याचा तो धवल आवेग दृष्टीत साचवून, डोळे बंद करून स्तब्ध झालो.क्षणार्धात मन मागेमागे गेलं. मेंदूतले वैद्यकशास्त्राच्या पहिल्या वर्षांतले हृदयक्रियेवरचे धडे आठवले. शरीरातल्या विविध भागांपर्यंत प्राणवायूयुक्त रक्त पोचवण्यासाठी हृदयाचा डावा कप्पा दर मिनिटाला ७२ वेळा आकुंचन पावतो. त्या मांसल कप्प्यातले शुद्ध रुधिर रक्तवाहिनीत शिरते, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनं वेगानं दीड फूट वर चढते आणि मेंदूला रसद पोहोचवते. अविरतपणे हे कार्य चालू असते. हृदयाचा हा डावा कप्पा जोरकसपणे आक्रसतो म्हणून रक्ताला वेग येतो. या जोरकस आकुंचनाला इजेक्शन म्हणतात. हृदयाच्या तपासणीत हे इजेक्शन किती जोराचं आहे, हे जोखण्याचा हिशेब मांडतात. (तो जोर कमी झाला तर हृदयाचा स्नायू मंदावलाय, असं निदान करतात.)असं वाटलं की, निसर्ग समुद्राचं क्षारयुक्त पाणी शुद्ध करून आपल्यापर्यंत पोहोचवतो. शुद्ध पाण्याचा तो प्रवाह म्हणजे हा जोरदार धबधबा आहे. यातून कोसळणारं शुद्ध पाणी पुढे ओढे, नाले आणि नद्यांच्या प्रवाहातून सर्वत्र पसरतं. ते वेगानं सगळीकडे पोहोचतं, कारण धबधबे आवेगानं पाण्याचं ‘इजेक्शन’ करीत राहतात. त्या इजेक्शनच्या आधारे जंगलं वाढतात, शेतं पिकतात आणि माणसं जगतात.निसर्ग या धबधब्यांच्या आधारे जीवन जोपासतो.पुन्हा डोळे उघडून पाहिलं तेव्हा तेच दृश्य! कडेकपारीरूपी अडचणींना पार करून आपल्याकडे आनंदानं धावत येणारं हे जीवन. विलक्षण प्रत्ययकारी अनुभव, भारावून टाकणारा, त्या घनगर्ज खर्जात मनाला नि:शब्द करणारा तो अनुभव. स्तिमित झालो, निसर्गाचा हा चमत्कार अनुभवून. काही क्षणानं वाटलं सगळं अंधूक होतंय. कळे ना डोळ्यांवरचं पाणी धबधब्यांच्या तुषारांचं होतं, की निसर्गाच्या विशुद्ध उत्कट अनुभूतीनं ओघळलेले माझे अश्रू होते..डॉ.राजेंद्र बर्वे - drrajendrabarve@gmail.com