पंधराव्या-सोळाव्या शतकात युरोपीय देशांमध्ये नव्या भूप्रदेशाच्या शोधासाठी नवनवीन सागरी मोहिमा काढण्याचे पर्व जोरात चालू होते. या मोहिमांपकी सर्वाधिक यशस्वी मोहीम पोर्तुगालच्या राजाने १४९८ साली काढलेली, भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाची ठरली. या मोहिमेचा जनक आणि कप्तान वास्को दा गामा हा मूळचा लिस्बनजवळ असलेल्या साइन्स या लहान गावातला. वास्को दा गामाची ओळख एक महान सागरी जलमार्ग संशोधक, पोर्तुगालचा निष्णात दर्यावर्दी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारक म्हणून आहे. लिस्बनच्या इमानुएल राजाने युरोपातून भारत आणि पूर्वेकडे जाण्याचा जलमार्ग शोधण्याच्या मोहिमेची कामगिरी वास्कोवर सोपवली. ८ जुल १४९७ रोजी वास्कोच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या मोहिमेत तीन मोठय़ा जहाजांमध्ये तीन वष्रे पुरेल एवढे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन १७० खलाशी सहभागी झाले होते. त्याशिवाय नकाशे आणि तोफा यांनी सुसज्ज अशा जहाजांमध्ये काही धर्मोपदेशक, सुतार, दुभाषे, सनिकही होते. आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून दक्षिणेत प्रचंड वादळाला तोंड देत वास्को २५ नोव्हेंबर रोजी केप ऑफ गुडहोप येथे पोहोचला. पुढे पूर्व आफ्रिकेच्या मोझांबिक, मोंबासा आणि मािलदी या बंदरांमध्ये झालेले हल्ले परतवत ही जहाजे १८ मे १४९८ रोजी केरळच्या कालिकत या बंदरात पोहोचली. युरोपातून जलमार्गाने भारताच्या किनाऱ्यावर आलेला वास्को दा गामा हा पहिला युरोपियन. या सागरी मोहिमेमागे पोर्तुगालच्या राजाचा खरा हेतू होता भारताशी प्रत्यक्ष व्यापार करणे. परंतु त्याआधीच कित्येक शतकांपासून अरब लोकांचा केरळच्या किनारपट्टीवर व्यापार प्रस्थापित झालेला होता. पोर्तुगीजांची जहाजे कालिकत बंदरात लागलेली पाहून अरब व्यापाऱ्यांनी तिथला राजा झामोरीन याचे कान वास्कोच्या विरुद्ध फुंकल्यामुळे झामोरीन आणि वास्कोचा थोडा संघर्ष झाला. पण अखेरीस काही मसाल्याचे पदार्थ खरेदी करून वास्को परतीच्या प्रवासाला निघाला. ऑगस्ट १४९९ मध्ये लिस्बनला परतल्यावर वास्कोचा मोठा सत्कार झाला. पुढे आणखी दोन भारतीय मोहिमांमध्ये वास्कोने नेतृत्व करून गोवा आणि कोचीन येथे पोर्तुगीजांचे राज्य स्थापून वास्को या राज्याच्या पहिल्या व्हाइसरॉयपदी नियुक्त झाला. त्याचा मृत्यू कोचीन येथेच झाला. - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com जलशुद्धीसाठी वनस्पती पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरातील सांडपाणी घराबाहेर सोडल्यावर मातीच्या उथळ नाल्यातून खेळवले जायचे. अशा नाल्यात अळू, कर्दळ, केळी अशी झाडे लावली जात. या झाडांच्या मुळांवरून गेल्यानंतर ते सांडपाणी खड्डय़ात साठवले जायचे, नारळी-पोफळीला दिले जायचे. या पारंपारिक पद्धतीचा नवा, शास्त्रीय अवतार म्हणजे फायटो-रेमेडीएशन, ज्यात झाडांच्या मदतीने सांडपाणी गाळून, शुद्ध करून पुनर्वापरास योग्य केले जाते. या तंत्रज्ञानाचा वापर पाण्यातील किंवा जमिनीतील दूषित घटक शोषून घेण्यास किंवा काढून टाकण्यास केला जातो. या पद्धतीमध्ये कर्दळ, पाणकणीस, सायपेरस यांसारख्या अंतर्भागात हवेच्या पोकळ्या असलेल्या वनस्पतींचा वापर केला जातो. या वनस्पती वाळू, विटकर, खडी यांनी तयार केलेल्या हलक्या माध्यमात लावल्या जातात. या माध्यमात सांडपाणी सुरळीतपणे वाहते. वाळू-खडींवर उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होते. वनस्पती आणि सूक्ष्मजीव पाण्यामध्ये विरघळलेले दूषित घटक शोषून घेतात, त्याच वेळी वनस्पतींची मुळे नत्र आणि स्फुरद यांसारखे उपयुक्त घटक आणि पाणी शोषून वाढतात. वायुजीवी आणि अवायुजीवी सूक्ष्मजंतू सेंद्रिय घटकांचे विघटन करतात. फायटो-रेमेडीएशन हे कमी खर्चाचे तंत्रज्ञान आहे. यामध्ये कमी गाळ निर्मिती, कमीत कमी जागा व जमिनीच्या उपलब्धतेप्रमाणे विविध आकारामध्ये त्याची उभारणी करता येते. वनस्पती त्यांच्या मुळाद्वारे सांडपाण्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करतात, सूक्ष्मजीवांच्या मदतीने पाणी दूषित करणारे पण वनस्पतींना उपयुक्त असे कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस इत्यादी घटक वनस्पती शोषून घेतात. ही काय्रे नसíगकरीत्या होत असल्यामुळे सतत देखभालीची गरज नसते. यामध्ये पाण्याचे वहन गुरुत्वावर राखले जाते. तसेच ते रेती-स्तराच्या खाली असल्याने ते गंधमुक्त आणि कीटकमुक्तही असते. या तंत्रज्ञानात बा ऊर्जेची गरज भासत नाही. पाण्याची वाढती गरज आणि वाढता तुडवडा भरून काढण्यासाठी या तंत्राचा उपयोग अपरिहार्य आहे. लहान-मोठी गृह-संकुले, लघु-उद्योग यांना हे तंत्रज्ञान फारच उपयुक्त आहे, काही मोठे उद्योगही या तंत्राचा उपयोग त्यांना कसा करता येईल यावर विचार आणि संशोधन करत आहेत. - प्राची निमकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org