अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने शनिवारवाडा ते विधानभवनावर शैक्षणिक समस्यांबाबत छात्र क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शहरातील विविध भागातील विद्यार्थी मोठ्यासंख्येने सहभागी झाले. या विषयी अभाविपचे प्रदीप गावडे म्हणाले, सध्यस्थितीला शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक समस्येला तरुण वर्गाला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सरकारी नोकर भरतीवरील बंदी त्वरित उठविण्यात यावी. भरतीसाठी प्रतिक्षा यादी लावण्यात यावी. तलाठी भरती परीक्षा एमपीएससी मार्फत मोफत घेण्यात यावी, राज्य शासन आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात १०० अभ्यासिका सुरु करण्यात याव्यात, त्याचबरोबर पुण्यात १५ शासकीय वसतिगृहे लवकरात लवकर सुरु करण्यात यावी. तसेच त्यातील वसतिगृहे यूपीएससी आणि एमपीएससीची तयारी करणाऱ्या गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी असावीत. या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मागण्याची दखल न घेतली गेल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला.