नाताळचा सण म्हटले, की आठवतो तो बाळगोपाळांना खाऊ आणि खेळणी देणारा सांताक्लॉज. छोटय़ा नातींसाठी गुरुवारी चक्क त्यांचे आजोबा हेच सांताक्लॉज झाले आणि आवडीची पुस्तके खरेदी करता आली याचा आनंद त्या मुलींच्या चेहऱ्यावर झळकत होता. हे आजोबा होते ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर.‘चार नगरातले माझे जीवन’ या डॉ. जयंत नारळीकर यांच्या आत्मकथनपर पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या आनंदामध्ये नारळीकर यांनी आपल्या नातींना सामावून घेतले. डॉ. नारळीकर आणि डॉ. मंगला नारळीकर यांनी चौथ्या इयत्तेतील कल्पना आणि चार वर्षांची आहना या दोघींना घेऊन गुरुवारी सकाळी ‘अक्षरधारा बुक गॅलरी’ गाठली. त्यांच्या कन्या गीता त्यांच्यासमवेत होत्या. कल्पना आणि आहना या दोघींना त्यांच्या आवडीची पुस्तके आजोबांनी घेऊन दिली. प्राणी, पक्षी, फुले, लहान मुलांच्या गोष्टी आणि नक्षीकाम (क्राफ्ट्स) अशी वेगवेगळय़ा विषयांवरील २८ पुस्तकांची खरेदी झाली. ‘अक्षरधारा’च्या रमेश राठिवडेकर आणि रसिका राठिवडेकर दाम्पत्याने डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांचे ‘रंग याचा वेगळा’ हे पुस्तक डॉ. नारळीकर यांना भेट दिले. तर, ‘चार नगरातले माझे जीवन’ या पुस्तकावर काही वाचकांनी नारळीकर यांची स्वाक्षरी घेतली. या दोघींना पुस्तके खरेदी करण्यासाठी आज मुद्दाम वेळ काढला. एरवी माझ्या वाचनासाठी मी पुस्तके घेतो, पण नातींसाठी पुस्तके घेणे हा आनंद काही वेगळाच, अशी भावना डॉ. नारळीकर यांनी व्यक्त केली. कल्पना अमेरिकेमध्ये सॅनफ्रान्सिस्को येथे असते. ती ३१ तारखेला घरी परतणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आज खरेदी केली. आहना पुण्यातच असते. लहान वयात वाचनाची गोडी लागते याचा आनंद आहे. घरी गेल्यावर पुस्तके कशी वापरतात बघू. भांडणं नाही झाली म्हणजे मिळविले, अशी मिस्कील टिप्पणीही त्यांनी केली. सुधा मूर्ती, नॅन्सी ड्रीम, द एन्व्हायर्नमेंट अँड पॉप्युलेशन, द स्नेक्स, अराऊंड अस, वैष्णोदेवी, अॅनिमल्स, बर्ड्स, झिम्मा या पुस्तकांसह माधुरी पुरंदरे यांचे ‘कागदी खेळ’ ही पुस्तके घेतली आहेत. कल्पनाने आठ पुस्तके घेतली, तर आहनाने तिच्यापेक्षा अधिक म्हणजे १३ पुस्तके घेतली याचाच आहनाला आनंद झाला असल्याचे डॉ. मंगला नारळीकर यांनी सांगितले. साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यापासून ‘चार नगरातले माझे जीवन’ या पुस्तकाच्या पाच दिवसांत ८० प्रती विकल्या गेल्या आहेत. आता नवी चौथी आवृत्ती लवकरच वाचकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे रमेश राठिवडेकर यांनी सांगितले.‘अक्षरधारा’च्या नोंदवहीमध्ये दिलेला अभिप्रायजयंत नारळीकर : हय़ा पुस्तकसंग्रहास सतत गर्दी लाभो!मंगला नारळीकर : मुलांना आवडेल असे वातावरण. भरपूर पुस्तके व ती हाताळण्याचे स्वातंत्र्य. मुलांमध्ये वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी सुयोग्य जागा. अभिनंदन! शुभेच्छा! पुण्याच्या इतर भागांतही शाखा निघाव्यात.