बालगंधर्व यांच्या गायनामध्ये विविधता होती. गायन आणि अभिनय या दोन्हींचा सुरेख मिलाफ असलेले उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणजे बालगंधर्व. भावपूर्णता, आकर्षकता आणि उत्फुतर्ता ही त्रिसुत्री त्यांच्या गायन आणि अभियनात नेहमीच अनुभवयाला मिळाली. या स्वर्गीय देणगीद्वारे बालगंधर्वांनी नाट्य संगीताला पूर्णत्वाला नेले अशी भावना रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी पुण्यातील कार्यक्रमात व्यक्त केली. बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या बालगंधर्व गुणगौरव पुरस्काराने बकुळ पंडीत यांना सुरेश प्रभु यांच्या हस्ते यंदाच्या बालगंधर्व गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 15 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी देवगंधर्व भास्करबुवा बखले पुरस्काराने सुप्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांना गौरवण्यात आले. 10 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी महापौर मुक्ता टिळक, एचवायटी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक भोजराज तेली, उपाध्यक्षा अनुराधा राजहंस, सचिव अवंती बायस आदी मान्यवर उपस्थित होते. सुरेश प्रभु म्हणाले, गेल्या काही वर्षातील सांस्कृतीक, सामाजिक आणि अन्य क्षेत्रातील स्थित्यंतरांमुळे नाट्यसंगीताकडे असलेला ओढा कमी झाला आहे. यावेळी बकुळ पंडित म्हणाल्या, बालगंधर्वांचा काळ हा सुवर्णकाळच होता. पण आजच्या पिढीने केवळ या सुवर्णकाळाचे स्मरणरंजन न करता आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. तसेच मागील पिढीतील गायकांचे अनुकरण न करता अनुसरण हे तत्व जोपासले पाहिजे. त्याचबरोबर आज नवीन संगीत नाटके आणि नव्या कलाकारांची संगीत रंगभूमीला गरज असून त्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.