‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’च्या विविध प्रतींमधील पाठभेदांतून प्रतीत होत असलेल्या शब्दांच्या अर्थामधील भेद उलगडणारा सर्वसमावेशक प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी शब्दार्थकोश सिद्ध झाला आहे. दैठणा (जि. परभणी) येथील संत दत्तबुवासाहेब ठाकूरबुवा संस्थानचे प्रमुख डॉ. तुकारामबुवा बा. गरुड (दैठणकर) यांनी ही ‘प्रतिशुद्ध श्रीज्ञानेश्वरी’ पारायण प्रत तयार केली आहे. गीतेचे तत्त्वज्ञान स्पष्ट करणारा ‘ज्ञानेश्वरी’ या अलौकिक ग्रंथाची भाषा यादवकालीन आहे. मूळ ग्रंथावरून त्याची नक्कल प्रत लिहून काढताना लेखकाकडून झालेले पाठभेद आणि तत्त्वज्ञानासारखा विषय यामुळे हा ग्रंथ सर्वसामान्य वाचकास दुबरेध झाला. हा ग्रंथ सुलभ व्हावा म्हणून १८ व्या शतकाच्या शेवटच्या काळापासून अनेकांनी अभ्यासपूर्वक सार्थ ज्ञानेश्वरीचे, तसेच शब्दार्थ कोश निर्मितीचे काम केले. आतापर्यंत झालेले सार्थ ज्ञानेश्वरीचे तसेच शब्दार्थ कोशाचे काम वेगवेगळ्या हस्तलिखित प्रतींवर आधारित आहे. कधी कधी पाठभेदामुळे एका प्रतीत असलेला शब्दार्थ दुसऱ्या प्रतीच्या शब्दकोशात सापडत नाही. आज ज्ञानेश्वरीचा उपलब्ध असलेला एकही ग्रंथ मूळ, पूर्ण आणि शुद्ध नाही, असे मामासाहेब दांडेकर यांनी स्पष्ट केले आहे. संत एकनाथांपासून काही संत आणि साहित्यिकांनी ग्रंथ शुद्धीकरणाचे काम केलेले आहे. प्राचीन ग्रंथाची मूळ संहिता सिद्ध करण्यासाठी अशा हस्तलिखितांची आवश्यकता असते. प्रा. रामदास डांगे यांनी पूर्वीच्या शुद्धीकराचा पूर्ण आढावा घेऊन मराठवाडय़ासह अन्य ठिकाणी उपलब्ध झालेल्या हस्तलिखित पोथ्यांचा उपयोग करून, तसेच सध्या प्रचलित छापील प्रतींचा अभ्यास करून संहिता शुद्धीकरणाचे संशोधनपर काम केले. हे संशोधन ‘मूळपाठदीपिका-श्रीज्ञानदेवी, चिकित्सक शुद्धपाठ आवृत्ती’ दोन खंडांमध्ये प्रकाशित केले आहे. या संशोधनास सरकारने आणि अभ्यासकांनी गौरविले आहे. या संशोधनाच्या आधारावर तुकाराम महाराज ठाकूरबुवा दैठणकर यांनी ‘प्रतिशुद्ध श्रीज्ञानेश्वरी’ ही पारायण प्रत तयार केली आहे. या प्रतीमध्ये ओवीचा छंद, भाषा, व्याकरण, भावार्थ आणि तत्त्वज्ञान यातील त्रुटीही दुरुस्त झाल्या आहेत. हा कोश निर्माण करताना एकाच शब्दाचे विविध अर्थ जे इतर कोशात आले आहेत ते एकत्र केले आहेत. अनेक शब्दकोशातील अर्थ एकत्रित केले असल्याने हा कोश ज्ञानेश्वरीतील शब्दार्थाच्यादृष्टीने उपयुक्त झाला आहे. ही पारायण प्रत वाचन- सुलभ आणि अर्थसुलभ झाली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतशिरोमणी तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामाचे औचित्य साधून गुरुवारी (३० जून) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते या पारायण प्रतीचे प्रकाशन होणार आहे. भवानी पेठ येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती ‘साहित्य दरबार’चे विनायक धारणे यांनी दिली.