एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा तपास पूर्ण करण्यासाठी पोलिसांना पंच साक्षीदाराची आवश्यकता असते. मात्र, न्यायालय आणि पोलीस ठाण्यात जाण्यात भीतीने सामान्य माणूस पंच साक्षीदार होण्यास तयार होत नसल्यामळे पोलिसांना गुन्हा उघडकीस आणला की पंच शोधत बसावे लागते. त्यामुळे तपासापेक्षा चांगला आणि न्यायालयापर्यंत टिकेल असा पंच शोधण्यातच पोलिसांना कष्ट घ्यावे लागतात. तसेच, पोलिसांकडून व्यावसायिक पंच साक्षीदारावर भर दिला जात असून प्रत्येक पोलीस ठाण्याला एकतरी व्यावसायिक पंच कायमचा जोडला गेला आहे.कोणताही गुन्हा घडल्यानंतर पोलीस त्या गुन्ह्य़ाचा तपास करून आरोपींना अटक करतात. मात्र, त्या गुन्ह्य़ाचा तपास करताना घटनास्थळाचा पंचनामा, वस्तू जप्त करून त्या पुरावा म्हणून सील करणे, अशी विविध कामे पंचांसमक्ष करावी लागतात. त्यांचे म्हणणेच न्यायालयात ग्राह्य़ धरले जाते. पंच साक्षीदार न्यायालयात उलटला तर आरोपींची सुटका होते. त्यामुळे कोणताही गुन्हा घडल्यानंतर पोलीस चांगला पंच साक्षीदार शोधतात. मात्र, पोलिसांबाबत असलेली भीती आणि त्यानंतर न्यायालयात द्यावी लागणारी साक्ष या भानगडीतून सामान्य माणून स्वत:ला नेहमीच दूर ठेवतो. त्या बरोबरच सामान्य माणूस गुंडांना घाबरूनसुद्धा पंच होण्यास तयार होत नाहीत. त्यातून एखादी व्यक्ती पंच साक्षीदार झाली तर ती न्यायालयात साक्ष देईपर्यंत टिकेल याची सुद्धा पोलिसांना शाश्वती नसते. त्यामुळे पोलिसांना तपास केल्यानंतर पंच शोधण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी पोलिसांकडून काही व्यावसायिक पंच तयार करण्यात आले आहेत. काही पैसे घेऊन हे पंच पोलिसांना हवे असतील त्या गुन्ह्य़ात पंच म्हणून उभे राहतात. प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एकतरी व्यावसायिक पंच तयार करण्यात आला आहे. शहरात दोन ते चार पंच असे आहेत की, त्यांनी तब्बल शंभर पेक्षा जास्त खटल्यात पंच साक्षीदार म्हणून भूमिका बजावली असल्याचे समोर आले आहे.याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुन्ह्य़ाचा तपास करताना प्रत्येक वेळी पंच साक्षीदार शोधत बसावे लागते. सामान्य माणून पंच होण्यास पुढे येत नाहीत. एखादा व्यक्ती पंच झाला तर त्याला न्यायालयात तारखांना हजर राहण्यासाठी वेळ नसतो. खटला सुरू होण्यास बराच कालावधी जातो. तोपर्यंत पंच साक्षीदार बऱ्याच गोष्टी विसरलेला असतो. न्यायालयात त्याची उलटतपासणी घेताना गडबडला की त्याचा खटल्याच्या निकालावर परिणाम होतो. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून एखाद्या व्यक्तीला लाच घेताना सापळा लावण्यासाठी शासकीय खात्यामधील व्यक्तीला पंच म्हणून बोलविले जाते. कारवाई करताना हा शासकीय कर्मचारी पंच साक्षीदार म्हणून भूमिका बजावतो. त्यामुळे पोलिसांना सुद्धा असे शासकीय पंच साक्षीदार मिळाले तर त्याचा नक्कीच फायदा होईल. ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार एखादी व्यक्ती अनेक खटल्यात पंच म्हणून येत असेल तर तिची साक्ष ग्राह्य़ धरू नये. कारण, ती व्यक्ती पोलिसांच्या जवळची असू शकते, असे म्हटले आहे. मात्र, दुसरीकडे पोलिसांसमोर अडचण अशी आहे की, पंच साक्षीदार होण्यास सामान्य व्यक्ती पुढे येत नाहीत. त्यामुळे त्यांना नेहमीच्या व्यक्तींवरच अवलंबून राहावे लागते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या गुन्ह्य़ात सरकारी कर्मचारी पंच असतात. इतर गुन्ह्य़ांमध्ये अतिमहत्वाच्या पंचनाम्यासाठी शासकीय कर्मचारी पंच साक्षीदार म्हणून घेतले त्याचा फायदा होईल.’’- हर्षद निंबाळकर (ज्येष्ठ वकील आणि महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य)