‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर करत संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांच्या पालखीचे मंगळवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. या वेळी वरूणराजानेही हजेरी लावली. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखीने मुक्काम केला. बुधवारी (२९ जून) भल्या पहाटेच पालखीचे पुण्याकडे प्रस्थान होणार आहे. तुकाराम महाराजांच्या ३३१ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पालखीचे निगडी येथे आगमन झाले. येथील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यानाजवळ शहरवासीयांनी पालखीचे जोरदार स्वागत केले. महापालिकेने या ठिकाणी स्वागत कक्ष उभारला होता. महापौर शकुंतला धराडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, पक्षनेत्या मंगला कदम, अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे, सहआयुक्त दिलीप गावडे, माजी महापौर आर. एस. कुमार, अपर्णा डोके आदी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने महापौर शकुंतला धराडे यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी उपमहापौर वाघेरे व माजी नगरसेवक नाना काटे यांनी पालखीचे सारथ्य केले. पालखीच्या स्वागतासाठी भाविकांची मोठय़ा संख्येने गर्दी झाली होती. त्यामध्ये तरूणाईची संख्या लक्षणीय होती. पालखीसोबत सेल्फी काढण्याची त्यांच्यात चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत होते.एखाद्या उत्सवासारखे वातावरण होते. अनेकांनी विविधांगी पोशाख परिधान केले होते. काही नागरिकांनी पर्यावरण जागृतीचे फलक सोबत आणले होते, तर स्वच्छताप्रेमी नागरिक स्वच्छतेचे आवाहन करताना दिसत होते. चर्मकार संघटनेच्या वतीने वारक ऱ्यांच्या चपलांची मोफत दुरूस्ती करून देण्यात येत होती. पालखी मार्गावर मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पुण्याहून तळेगावकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पालखी आकुर्डीतील विठ्ठलमंदिरात मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली. या वेळी गुलाब गोपाळ कुटे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या वेळी नागरिकांची मोठी गर्दी होती. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास पालखीचे पुण्याकडे प्रस्थान होणार आहे. भेटवस्तूंची पळवापळवी िपपरी महापालिकेच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या िदडीप्रमुखांना विठ्ठल रखूमाईचे आकर्षक शिल्प आणि त्यासोबत वृक्षारोपण करण्यासाठी बियांच्या पिशव्या देण्यात येत होत्या. जवळपास ३३० िदडय़ांना वाटप करण्याचे पालिकेचे नियोजन होते. तथापि, काही नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी तसेच नातेवाइकांनी विठ्ठलाचे शिल्प घेऊन पोबारा केला. हा प्रकार लक्षात आल्यामुळे महापौर संतापल्या, त्यांनी भेटवस्तू वाटपाची सूत्रे स्वत:कडे घेतली. त्यानंतर, सुरळीत वाटप पूर्ण झाले. यापूर्वी, अनेकदा अशाप्रकारे भेटवस्तू पळवण्याचे ‘उद्योग’ झाले आहेत. निगडीतील अनुभव पाहता माउलींच्या पालखीचे स्वागत करताना खबरदारी घेण्यात येईल, अशी सारवासारव प्रशासनाकडून करण्यात आली.