शनिवारी दुपारनंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला. मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सायंकाळी सातच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. तो दुसऱ्या दिवशीच पूर्ववत झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
आजदे, सोनारपाडा, देसलेपाडा, नांदिवली, आयरे, भोपर, रामचंद्रनगर, गांधीनगर, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी, डोंबिवली स्टेशन परिसर आदी भागात शनिवारी सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाला. औद्योगिक परिसरातही वीज नसल्याने याचा उद्योगधंद्यावर परिणाम झाल्याचे उद्योजकांनी सांगितले. काही भागात दुसऱ्या दिवशी रात्री अडीच वाजता वीज आली. काही परिसरात सकाळी सात वाजता, तर काही परिसरात सकाळी ११ वाजता वीज आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
महावितरणचे अतिरिक्त अभियंता पी.के. थैल यांच्याशी संपर्क साधला असता, अवकाळी पावसामुळे केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाला व त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे त्यांनी सांगितले.