शिवसेनेला धक्का देण्याचा प्रयत्न उल्हासनगर महापालिका निवडणुकीत सिंधीबहुल प्रभागांचा मुद्दा एकीकडे चर्चेत असताना शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मराठी वस्त्यांमध्ये मनसेला बळ देण्याची रणनीती राष्ट्रवादीने आणि विशेषत: ओमी कलानी यांच्या गटाकडून आखली जात आहे. काही मराठी प्रभागांमध्ये मनसेसोबत छुपी युती करण्याची रणनीती आखली जात आहे. तसा प्रस्तावही मनसेपुढे मांडण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. गेल्या महापालिका निवडणुकीत मनसेची अवस्था अगदीच तोळामासा होती. शहरात मनसेचे दोन गट स्पष्टपणे पाहायला मिळत होते. एकीकडे सत्ता उपभोगणारा एकमेव नगरसेवक आणि दुसरीकडे विविध विषयांवर आंदोलने करणारे मनसेचे कार्यकर्ते असे चित्र होते. सत्तेचे गणित जमविताना शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय मनसेने घेतला असला तरी दुसरीकडे शहरातील पक्षाचे कार्यकर्ते विविध आंदोलनांच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करताना दिसत होते. उल्हासनगर महापालिकेच्या २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत जयश्री पाटील यांच्या रूपाने मनसेला पहिला नगरसेवक मिळाला. नंतरच्या काळात मात्र पाटील यांनी साई पक्षात प्रवेश केला. दुसऱ्या निवडणुकीत रवींद्र दवणे यांच्या रूपाने पक्षाचा एकमेव नगरसेवक निवडून आला. त्यांनीही काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सध्या मनसेची पाटी कोरी आहे. मनसेला महत्त्व सिंधी मतांसोबत मराठी मते हातातून जाऊ नयेत, यासाठी मनसेला सोबत घेऊन शिवसेना आणि भाजपच्या मराठी मतांना सुरुंग लावण्याची रणनीती ओमी कलानी यांनी आखली आहे. ओमी यांच्यातर्फे मनसेकडे हा प्रस्ताव पाठविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.याबाबत नुकतीच डोंबिवली येथे मनसेचे नेते राजू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुख व नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष किमान ४० जागा लढवेल. ओमी यांच्यासोबतची बोलणी यशस्वी झाल्यास किमान २५ ते ३० जागांवर उमेदवार उभे केले जातील, असे संजय घुगे व प्रदीप गोडसे यांनी दिली.