भाजपचे राज्यसभा सदस्य विनय कटियार यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत पुन्हा एकदा राममंदिरचा मुद्दा उपस्थित केला आहे. गुरूवारी झालेल्या एका सभेत त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपला विजय मिळणे आवश्यक आहे, असे म्हटले. भाजपला यूपीत बहुमत मिळाले तरच भाजपला राज्यसभेत बहुमत मिळवता येईल. जर पक्षाकडे राज्यसभेत बहुमत असेल तेव्हाच मंदिर बनवता येईल. त्यामुळे इथे होणारा विकास हा राम मंदिराशिवाय अर्धवट असल्याचे त्यांनी म्हटले. देशातील एकता व अखंडतेसाठी इथे मंदिर बनवावेच लागेल, असे त्यांनी ठासून सांगितले.

यावेळी त्यांनी समान नागरी कायदा आणि तिहेरी तलाक सारख्या मुद्यांवरही भाष्य केले. तिहेरी तलाक हा मुस्लिम महिलांवर अन्याय आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी आणणे आवश्यक आहे. देशात एका लग्नाचाच कायदा असला पाहिजे. नाहीतर तीन-चार लग्ने होतील. तीन-तीन-चार-चार मुले होती आणि कुटुंबातील सदस्य संख्या २०-२५ होईल, असे ते म्हणाले.
परंतु, विनय कटियार यांचे म्हणणे अयोध्येतील लोकांना आवडले नसल्याचे दिसते. राम मंदिराचा मुद्दा हा फक्त निवडणुकीतील मुद्दा असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे कटियार यांच्या भाषणानंतर राजनाथ सिंह यांनीही अयोध्यातील लोकांसमोर भाषण केले. परंतु, त्यांनी राम मंदिर, तिहेरी तलाकसारख्या मुद्यांना हात घातला नाही. राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानचा उल्लेख केला. भारत कोणाला छेडत नाही. पण जो भारताला छेडतो त्याला भारत सोडत नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा साधला. काम बोलत नाही, काम दिसतं, असा टोला त्यांनी या वेळी लगावला.