ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन होऊन नवा पालघर जिल्हा निर्माण झाला. त्याच धर्तीवर प्रशासकीय कारभाराचे सुसूत्रीकरण करण्यासाठी ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ाची पुनर्रचना करून कर्जत-कल्याण परिसराचा नवा स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी वाढू लागली आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर नेरळ-कर्जत परिसरात घर घेणे निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. विस्तारित मुंबईने ठाण्याची वेस कधीच ओलांडली असून, आता कनिष्ठ मध्यमवर्गीय परवडणाऱ्या घरांच्या शोधात नेरळ-कर्जतमध्ये स्थायिक होऊ लागले आहेत. मुंबई-ठाण्यात घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे छोटय़ा बजेटमध्ये आपले स्वत:चे घर असावे म्हणून अनेक नोकरदार कर्जत-नेरळमधील तुलनेने स्वस्त घरांचा पर्याय स्वीकारू लागले आहेत. कारण ठाणे-डोंबिवलीच्या तुलनेत निम्म्या किमतीत या परिसरात चांगल्या सदनिका उपलब्ध आहेत. मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी येथे अद्ययावत सुविधांसह गृहसंकुले उभारली आहेत. रेल्वेच्या उपनगरीय सेवेमुळे नेरळ-कर्जत काही आता मुंबई-ठाण्यापासून फारसे लांब राहिलेले नाही. पुन्हा शुद्ध हवा, मुबलक पाणी आणि माथेरानच्या निसर्गाचा सहवास हा बोनस आहे. मुंबईच्या पाठोपाठ ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील घरांच्या किमतीही आता मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात राहिलेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अंबरनाथ-बदलापूर या दोन शहरांचा पर्याय मोठय़ा प्रमाणात स्वीकारला जाऊ लागला. परिणामी गेली काही वर्षे बदलापूर हे मध्य रेल्वेवरील मुंबईच्या विस्तारित परिघाचे एक टोक मानले जात होते. मात्र रिअल इस्टेट विश्वातील सध्याची वाटचाल पाहता मुंबईच्या परिघाने आता बदलापूरची पर्यायाने, ठाणे जिल्ह्य़ाचीही वेस ओलांडली आहे. नवी मुंबईच्या दिशेने रायगड जिल्ह्य़ातील पनवेलपर्यंत हातपाय पसरलेल्या मुंबईने आता थेट दुसऱ्या टोकाला असलेल्या माथेरानचा पायथा गाठला आहे. माथेरानच्या तळाशी असलेले नेरळ हे जंक्शन स्थानक पूर्वी सेकंड होम्ससाठी प्रसिद्ध होते. टुमदार बंगले, हिरवाईने वेढलेली टुमदार शेतघरे हे नेरळचे एकेकाळचे वैशिष्टय़ मानले जात होते. शनिवार-रविवारचा विकेन्ड अथवा दिवाळी-मे महिन्याच्या सुट्टीत नेरळला उच्च मध्यमवर्गीय आणि नवश्रीमंत मुंबई-ठाणेकरांची वर्दळ असायची. मात्र आता सेकंड होम्सच्या या निवांत जगात शहर विकासाचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. बंगलेवजा घरांच्या जागी बहुमजली अपार्टमेंट, टॉवर्स उभे राहू लागले आहेत. नेरळच कशाला त्याआधीचे शेलू किंवा पलीकडचे भिवपुरी रोड, कर्जत येथे राहण्याचा पर्याय कनिष्ठ मध्यमवर्गीय स्वीकारू लागले आहेत. नेरळ-कर्जत भागात तुलनेने कमी किमतीत सदनिका उपलब्ध आहेत. तसेच या परिसरातील वातावरणही ठाणे-डोंबिवलीच्या तुलनेत कितीतरी चांगले आहे. तसेही ठाण्याच्या पलीकडे उपनगरी रेल्वे हाच काय तो वाहतुकीचा एकमेव पर्याय आहे. त्यामुळेच बजेटमधील घरांसाठी अनेक कुटुंबं दोन स्टेशन्स पुढे जात या नव्याने आकारास येणाऱ्या शहरांमध्ये निवारा शोधू लागले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांतील मालमत्ता प्रदर्शनात नेरळमधील घरांची अधिक प्रमाणात विक्री झाली. त्याचे कारणही तेच आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे औद्योगिक स्थलांतर. गेली काही वर्षे मुंबईतील मोठय़ा कंपन्या अंबरनाथला स्थलांतरित होऊ लागल्या आहेत. अंबरनाथ पूर्वेकडच्या अतिरिक्त अंबरनाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीत सध्या ८०० लहान-मोठय़ा कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून किमान ५० हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. त्यात गोदरेज, महिंद्रा अँन्ड महिंद्रा यासारख्या मोठय़ा कंपन्या आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अंबरनाथच्या एमआयडीसीमध्ये प्रकल्प उभारले आहेत. नोकरीनिमित्त येथे येणारे आजूबाजूच्या परिसरातच स्थिरावू पाहात आहेत. नेरळ-कर्जतमध्ये राहणे त्यांच्यासाठी सोयीचे आहे. कर्जत-भिवपुरी रोड परिसर नवे शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये या परिसरात आहेत. मॉल संस्कृती अंबरनाथ-बदलापूरच्या वेशीपर्यंत येऊन ठेपली आहे. तिथून नेरळ गाठण्यात या नव्या शॉपिंग संस्कृतीला फारसा वेळ लागणार नाही. थोडक्यात, मुंबई शहरातील साऱ्या सुविधा आता या नव्या विस्तारित मुंबईत उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यामुळे दूर कुठेतरी येऊन राहिलोय, असे वाटायचे काही कारण नाही. केवळ कनिष्ठवर्गीय गरजूच नव्हे, तर गुंतवणूक म्हणूनही अनेकजण या भागातील गृहप्रकल्पांकडे पाहू लागले आहेत. त्यात अर्थातच त्यांचा फायदा आहे. गेली एक-दोन वर्षे घरांच्या किमती काहीशा स्थिर असल्या तरी दीर्घकालीन गुंतणूक म्हणून स्वस्तातले घर निश्चितच फायद्याचे ठरू शकणार आहे. नेरळ-कर्जतच्या वाढत्या नागरीकरणाची अन्यही काही कारणे आहेत. मुंबई-ठाण्यात राहणारे अनेकजण तेथील गजबजाटाला कंटाळून स्वत:हून नेरळला येऊन स्थायिक होऊ लागले आहेत. पूर्वी हाच वर्ग शनिवार-रविवारच्या विकेन्डला या परिसरात राहायला यायचा. त्या दोन दिवसांत त्यांचे या शहराची चांगलेच स्नेहबंध जुळले. मात्र त्यावेळी नोकरी-व्यवसायात कार्यरत असल्याने या दोन दिवसांव्यतिरिक्त त्यांना नेरळ-कर्जतमध्ये इच्छा असूनही राहता येत नव्हते. मात्र निवृत्तीनंतर त्यांनी आपली हौस भागवायला सुरुवात केली आहे. बऱ्याच लोकांनी आपल्या सेकंड होम्सलाच मुख्य घर बनविले आहे. मुंबई-ठाण्यातील मालमत्तांना आता सोन्याचा भाव आला आहे. मोक्याच्या जागी असलेल्या सदनिकांचे कोटय़वधी रुपये मिळतात. काहींनी अशी घरे विकून दूरवरच्या ठिकाणी कितीतरी स्वस्त आणि प्रशस्त घरे घेण्याचा व्यवहारापणा दाखविला आहे. त्यातूनही नेरळ-कर्जत पट्टय़ात नवे महानगर वसू लागले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठाणे-डोंबिवलीच्या तुलनेत या परिसरात मुबलक पाणी मिळण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्य़ातील पाणीसमस्या गंभीर आहे. किमान पुढील दहा वर्षे तरी नवे जलस्रोत निर्माण होण्याची शक्यता नाही. उलट कर्जत परिसरात बाणगंगा प्रकल्प मार्गी लागला आहे. त्यामुळे नव्याने वसणाऱ्या येथील शहरांना पुरेसा पाणीपुरवठा होण्याची हमी आहे. ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन होऊन नवा पालघर जिल्हा निर्माण झाला. त्याच धर्तीवर प्रशासकीय कारभाराचे सुसूत्रीकरण करण्यासाठी ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ाची पुनर्रचना करून कर्जत-कल्याण परिसराचा नवा स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी वाढू लागली आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर नेरळ-कर्जत परिसरात घर घेणे निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. निसर्गरम्य परिसरातील घरांना पसंती बदलापूर आणि कल्याण नंतर नेरळ हे निवासी घरांसाठी सर्वात मोठी मागणी असलेलं ठिकाण आहे. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या नेरळ मध्ये घर घेण्यास ग्राहक उत्सुक आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, मुंबईशी थेट जोडला गेलेला रेल्वेमार्ग. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरीक आपलं सेकंड होम घेण्यासाठी नेरळसारख्या निसर्गरम्य परिसराला पसंती देत आहेत. परिणामी आम्हीही उत्तम दर्जा असलेली घरे परवडणाऱ्या किंमतीमध्ये देण्यास प्राधान्य देत आहोत. कर्जत-नेरळ ही ठिकाणं प्रदूषणविरहीत अशा निसर्गरम्य परिसरात परवडणाऱ्या किंमतींमध्ये उपलब्ध करून देतआहेत. भावीन पटेल, व्यवस्थापकीय संचालक, तुलसी इस्टेट - प्रतिनिधी