स्वयंपाकघरात निरनिराळ्या नावांची भांडी असत. उदा. ठोक्याचे पातेले, तसराळे, पितळी, वेळणी, बोगणी, ओगराळे, गंज, पेढेघाटी डबे, (खापरपोळ्या करण्यासाठी) मातीचे ‘खापर’, चिनीमातीचे ‘सट’, कालथे, पळ्या, सांडश्या. वगैरे. लोणची, मुरंबे साठविण्यासाठी मोठमोठय़ा चिनीमातीच्या ‘बरण्या’ असत आणि त्यांना फडक्यांचे ‘दादरे’ बांधलेले असत. मीठ, चिंचा, आमसुले ठेवण्यासाठी ‘रांजण’ असत. सुरेश भट यांनी आपल्या एका कवितेत म्हटल्याप्रमाणे अष्टागरातल्या अलिबाग तालुक्यातील ‘चौल’ या गावी, ‘या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते’. एक मातीच्या भिंती असलेले आमचे साधेसुधे कुडा-मेढींचे एक जुने घर होते. नेहमीप्रमाणे आणि कोकणातल्या परंपरेप्रमाणे आजोबांच्या मृत्यूनंतर जे व्हायचे ते झाले आणि आम्ही आमच्या त्या घरालाच नव्हे तर त्या निसर्गरम्य गावालाही कायमचे मुकलो. परवा एका घटनेमुळे मी पुन्हा एकदा लहान लहान बापुडवाणा, हळवाहळवा झालो आणि माझ्या मनाची पाकोळी एक अनामिक अशी हुरहूर आणि चुटपूट लागून क्षणार्धात लहानपणीच हरवलेल्या गावी आमच्या एकेकाळच्या त्या घरी घेऊन गेली आणि वायुवेगाने त्या भूतकाळातल्या वास्तूत पाकोळीसारखी भिरभिरून आली. घराच्या पुढे हमखास ‘अंगण’, ओसरी असे, आणि थोडीशी शेती वगैरे असल्यास मागच्या बाजूला ‘खळे’ असे. कौलांना ‘नळे’ म्हणत असत, ‘मेढी’ असत, पुढीलदारी, मागीलदारी, माजघरात असे शब्द असत. मागच्या पडवीमागे अंघोळीचे पाणी तापविण्यासाठी एक ‘चुल्हाणे’ असे, (आणि बाजूला ‘अळवाचं खाचर आणि बसण्यासाठी एक धोंड) त्यावर एक मोठे बुडाशी ठार काळे झालेले मोठे ‘तपेले’ असे आणि ‘कढत’ पाणी उपसण्यासाठी बाजूलाच हाताशी एक नारळाच्या एका मोठय़ा करवंटीपासून बनवलेले एक लांब दांडीचे एक ‘ओगराळे’ ठेवलेले असे. घरोघरी पाणी तापविण्यासाठी (‘लाकडे’ नव्हे, तर) ‘फाटी’ आणि ‘पातेरा’ (वाळलेला पालापाचोळा) जाळण्यात येत असे आणि त्याचा आसमंतात एक मस्त, खमंग, सुगंधी धूर दरवळत आणि रेंगाळत असे. काही सधन घरांत पाणी तापविण्याचा तांब्याचा ‘बंब’ असे. अंघोळी झाल्यानंतर आपल्याच बागेतली जास्वंदी, तगरी, सोनटक्का, अनंत किंवा अशाच उपलब्ध फुलांनी आजोबा किंवा मोठे काका घरच्या देवांची ‘यथासांग’ पूजा करीत असत, त्यानंतर ओंजळीत मिळणाऱ्या तीर्थाचा थंडावा, आनंद आणि समाधान ‘फ्रीज’च्या ‘चिल्ड’ पाण्याला नाही. त्या सोनसकाळी सगळ्या घरात एक कढत पाण्याचा, पूजेच्या फुलांचा, समई-निरांजनाचा, उदबत्तीच्या (अगरबत्ती नव्हे) स्वयंपाकाचा, गोठय़ाचा, शेणाने सारवलेल्या जमिनींचा एक अनामिक असा प्रसन्न, मंदमधुर, ओलसर सुगंध दुपापर्यंत दरवळत, रेंगाळत आणि तरंगत, तरळत राहात असे. आजोबा अनवाणीच, (माझ्या आजोबांनी मरेपर्यंत पायात चपला घातल्या नाहीत, का? माहीत नाही) धोतर आणि उपरणे घेऊन ‘पडशी’ घेऊन पूजा, वगैरे कामांना निघून जात, बाहेरगावी रामाच्या, मारुतीच्या देवळात ‘वस्ती’ करून तीन दगड मांडून मिळालेल्या ‘शिध्या’ने स्वत: ‘रांधत’ असत (भात, आमटी, पापड, लोणचं, मिळाल्यास ताक, आणखी काय हवं? ). प्रत्येक घरात त्यावेळी निदान एकतरी लाल ‘आलवणात’ली केसांचे ‘वपन’ केलेली आजी असायची. ती सकाळी फटफटायच्या (उजेडायच्या) आत काळोखात ‘मागीलदारी’ झापाच्या आडोशाला रिठे-रिंग्यांनी ‘अंग धुऊन’ घ्यायची. कौलारातून झिरपणाऱ्या कोवळ्या उन्हाच्या तिरप्या कवडशांनी उजळलेल्या आणि चुलीच्या निळसर धुराने भरलेल्या स्वयंपाकखोलीत चकचकीत ‘पितळी’ कपबशीतून (गाळणी नव्हे तर) फडक्याने पिळून पिळून गाळलेला कढत कढत (‘गरम’ शब्दाला ती मजा नाही आणि तो प्रसन्न स्पर्शही नाही) गुळाचा चहा एखादे कटू कर्तव्य एकदाचे पार पाडावे तशी ‘पिऊन टाकत’ असे आणि दिवसभर कामाच्या ‘रामरगाडय़ाला’ जुंपून घेत असे. दुपारी तिच्यासाठी परंपरेने राखून ठेवलेल्या ‘बाळंतिणीच्या अंधारकोठडीत’ उशाला लाकडी पाट घेऊन अंग आखडून घेऊन ती बिचारी उगाच जराशी ‘डुलकी’ काढत असे, पुन्हा ‘रामरगाडा’ चालू होत असे. ‘मागीलदारी’ (परसदारी) गुरांचा गोठा असे, मागे विहिरीवर एक बैलाचा ‘रहाट’ असे आणि सकाळच्या वेळी सगळ्या वाडय़ांमध्ये सुरू असलेल्या रहाटांचा वेगवेगळ्या पट्टीतला एक खर्जातला मधुर गंभीर ध्वनी गुंजत असे. विहिरीच्या शेजारी पाण्याची एक मोठी दगडी ‘डोण’ असे. माडा-पोफळीच्या खाली पाणी वाया जाऊ नये म्हणून मातीची ‘आळी’ केलेली असत आणि त्यांना आणि एकूणच ‘वाडी’ला पाणी घालण्याच्या क्रियेला ‘शिंपण’ म्हणत असत. (त्यावेळी घरोघरी माणसं ‘संडास’ला नव्हे, तर ‘परसा’कडे (म्हणजेच परसाच्या दिशेला) जात असत. स्वयंपाकघरात निरनिराळ्या नावांची भांडी असत. उदा. ठोक्याचे पातेले, तसराळे, पितळी, वेळणी, बोगणी, ओगराळे, गंज, पेढेघाटी डबे, (खापरपोळ्या करण्यासाठी) मातीचे ‘खापर’, चिनीमातीचे ‘सट’, कालथे, पळ्या, सांडश्या. वगैरे. लोणची, मुरंबे साठविण्यासाठी मोठमोठय़ा चिनीमातीच्या ‘बरण्या’ असत आणि त्यांना फडक्यांचे ‘दादरे’ बांधलेले असत. मीठ, चिंचा, आमसुले ठेवण्यासाठी ‘रांजण’ असत. खायच्या पदार्थामध्ये सकाळी न्याहारीला ‘मऊभात, मेतकूट, तूप, पेणच्या पोह्यचे (तळलेले नव्हे) भाजलेले पापड आणि लोणचे. दुपार आणि संध्याकाळच्या मध्ये ‘मधवेळ’चे खाणे म्हणून (उपमा नव्हे) आंबट सांजा (किंवा तिखटाचा सांजा), तांदळाच्या कण्या, दडपे पोहे, वगैरे पदार्थ असत. खवलेला नारळ हा स्थायीभाव. जेवणात मुख्य अन्न म्हणून भात असे, गोडं वरण, आमटी, ‘ऋतुकालोद्भव’ भाज्या असत. ‘भोजनान्ते’ ताक हवंच आणि लहान मुलांना दही-भात. सणासुदीला क्वचित चारोळी पेरलेलं श्रीखंड असे. पण लवंगा वगैरे घातलेला ‘साखरभात’ मात्र आता इतिहासजमा झाला आहे. कधीतरी ‘खांडवी’ असे. आंबेपोळ्या, फणस पोळ्या असत. रंगरसगंधात न्हायलेल्या सतेज टवटवीत श्रावण महिन्यात तर सोमवार, शुक्रवार (पुरणाचा वार), शनिवार आणि नैमित्तिक सणांना खायची प्यायची मर्यादित चैन असे. उपासाला हल्लीसारखे साबुदाण्याचे ‘वडे’ नसत तर खिचडी असे, घरची केळी, दही, उकडलेले शेंगदाणे, उकडलेली रताळी.. असं बरंच पोटभर खाऊन ‘उपास’ साजरा होत असे. पुरुष मंडळींच्या तोंडी सर्रास शिव्या असत आणि काही प्रसंगी बायकांच्या तोंडीही थोडय़ाशा ‘अश्लीलते’कडे झुकणाऱ्या अनुप्रास, यमके आणि रूपकांचा भरपूर वापर असलेल्या म्हणी असत. पुरुष ‘वय’ झाल्यामुळे ‘संपत’ किंवा ‘आटोपत’ असत, तर बायका बहुतेक वेळा ‘बाळंतरोगां’मुळे ‘वारत’ असत. हल्ली ज्याला ‘अॅबोर्शन’ किंवा ‘मिसकॅरेज’ म्हणतात, त्याला (निदान आमच्या भागात तरी) त्यावेळी बायका एकमेकींच्या कानांत ‘ती दुवेतली’ असं काहीतरी कुजबुजत असत. पुरुष ‘बीजवर’ ‘तिजवर’ असत, तर बायका ‘दुसरेपणा’च्या ‘तिसरेपणा’च्या असत. ‘लुगडे’ नऊवारी असे आणि पातळ ‘पाचवारी’. बायकांची कापडे ‘चिटांची’ असत किंवा पातळे छापील ‘वायल’ ची असत. पुरुषांच्या तोंडी (गेल्या वर्षी, पलीकडल्या वर्षी’ नाही, तर) ‘गुदस्ता, तिगस्ता’ असे शब्द असत. घरोघरच्या गाई-म्हशींना दिवस बघून ‘दाखवायला’ घेऊन जात असत आणि मग यथावकाश गायी म्हशी व्यायल्या की घरोघरी वेलचीयुक्त खमंग ‘खरवसा’ची मेजवानी झडत असे. गेले ते गाव, गेले ते दिवस, गेल्या त्या वास्तू आणि ते शब्दही.. सुभाष जोशी subhashjoshi.1948@gmail.com