सरत्या श्रावणसरींच्या शिडकाव्यामुळे दुष्काळछायेच्या सावटातून सावरण्याच्या, दिलाशाच्या वातावरणात विघ्नहर्त्यां श्रीगणेशाचे आगमन झाले. तरीही दुष्काळावरून सुरू असलेले राजकारण, शाकाहार-मांसाहाराच्या वादात शिजू पाहणारी समाजातील कटुता, माँ-बाबा-बुवांचा ढोंगी बाजार, नियमांना डावलून आणि सामाजिक स्वास्थ्याचे सारे निकष धुडकावून रस्तोरस्ती मांडलेले बेदरकार मंडप, आणि सालाबादप्रमाणे भेडसावणाऱ्या लहानमोठय़ा चिंता होत्याच.. हे सारे सहन करीत महाराष्ट्राने भक्तिभावाने आपल्या आराध्य दैवताचे स्वागत केले. आणि विघ्नहर्त्यां गणेशाच्या मंत्रपुष्प-आरतीच्या सुरात सारी दुखे, व्यथा-वेदना तात्पुरत्या का होईना, हलक्या झाल्या.. कारण, जगण्याची आणि सहन करण्याची नवी ताकद देण्याची शक्ती या उत्सवात आहे. एका बाजूला काहीसे निराशेचे सूर उमटत असले, तरी या वातावरणाला दिलाशाची किनारदेखील आहे. समाजात विधायक कार्याचा वसा घेऊन अनेक व्यक्ती-संस्था निरपेक्षपणे समाजमन घडविण्याच्या कार्यात गुंतल्या आहेत. ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमातून या संस्थांची एक विधायक साखळी गेल्या पाच वर्षांत ‘लोकसत्ता’ने बांधली. या वार्षिक दानयज्ञाची पाचवी आवृत्ती या वर्षी सादर झाली. वेगवेगळ्या क्षेत्रांत सामाजिक जाणिवेने काम करणाऱ्या दहा नव्या संस्थांची ओळख या उपक्रमातून लाखो वाचकांना झाली. या सत्कार्यात सहभागी होण्याची अनेकांची अतीव इच्छा असते. मात्र, व्यक्तिगत, कौटुंबिक किंवा अन्य अनेक कारणांमुळे त्यामध्ये थेट सहभाग शक्य होत नाही. अशा वेळी, कुणी तरी आपल्या मनातल्याच कामात झोकून दिल्याची माहिती मिळते, आणि त्यामध्ये सहभागी होण्याच्या इच्छापूर्तीचा क्षण जवळ येतो. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमातून यंदा गणेशोत्सवकाळात नव्या दहा संस्थांचा परिचय करून दिला गेला. समाजाचा आधार बनण्यासाठी धडपडणाऱ्या या संस्थांना समाजाकडूनही आधाराची गरज आहे. आपली सत्कार्याची इच्छा आणि या संस्थांची गरज यांची सांगड घालण्यासाठी ‘लोकसत्ता’ हे निमित्त मात्र आहे. दरवर्षांप्रमाणे यंदाही या संस्थांना लोकसत्ता परिवार व हितचिंतकांकडून मोलाचा आर्थिक हातभार लागेल आणि हीच समाजातील दुख, विघ्ने दूर करणाऱ्या विनायकाची खरी आराधना ठरेल! response.lokprabha@expressindia.com