वाइल्डलाइफ फोटोग्राफीचं सध्या पेव फुटावं तशी सगळी तरुणाई कॅमेरे घेऊन जंगलात धावते आहे. फेसबुकच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाइक्स मिळवण्यासाठी प्राण्यांचे-पक्ष्यांचे फोटो अपलोड करत असतात. पण फोटो हाच एक उद्देश घेऊन सगळे जंगलात जात नाहीत. जंगलाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणाऱ्या काही तरुणांविषयी..
उत्क्रांतीच्या ओघात माकडापासून माणूस निर्माण झाला. परिस्थितीनुसार त्याच्या राहण्यात, वागण्यात बदल  होत गेला.. प्राथमिक इयत्तेतला हा इतिहास सर्वाना ठाऊकच आहे. त्या गोष्टीला आज शेकडो वर्षे होऊनही, माणसाला आजही निसर्गाबद्दलची ओढ कायम आहे. जंगलप्रेमींच्या मंदियाळीत आजच्या हौशी भटक्या पर्यटकापासून ते प्रोफेशनल ट्रेकपर्यंत आणि निसर्ग चित्रकारापासून ते फोटोग्राफपर्यंत सगळेच येतात. कोणाला ही आवड अनायासे लागते तर कोणी हे जंगलवाचन म्हणून सर्व व्यवस्थित ठरवून करियर म्हणूनही करतो. या बाबतीत प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. पण सर्वाच्या मनात एकच भावना असते, ती म्हणजे निसर्गाबद्दल असलेली ओढ आणि कुतूहल.

जितका जंगलाच्या जवळ गेलो तितकाच प्रगल्भ होत गेलो. – वरूण साने

वाइल्डलाइफ फोटोग्राफीला छंद म्हणून मानणारे आज अनेक जण भेटतात. तसाच एक म्हणजे मुंबईचा वरुण साने. वाणिज्य शाखेत शिकत असूनसुद्धा त्याने हा छंद जोपासला आहे. तो याबद्दल सांगतो, ‘फोटोग्राफी आणि चित्रकलेची आवड मला खूप आधीपासूनच होती. त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग सारखे चालूच असायचे. एकदा मोकळ्या वेळात मला माझ्या मित्रासोबत जंगलात जायचा योग आला आणि मी जंगलाच्या अक्षरश: प्रेमातच पडलो. मग मला ओढ लागली ती निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला कॅमेरामध्ये बंदिस्त करण्याची. मग ते इवलंसं गवतफूल असू दे किंवा झाडांवर उनाडक्या करणारी माकडं असू देत. माझे एक-दोन मित्र याच क्षेत्रातले असल्याने त्यांच्याकडून बरंच काही वेळोवेळी शिकत गेलो आणि अजूनही शिकतोय. पर्यावरणाला त्रास न होऊ देता, त्याच्या किती जवळ जाता येऊ शकतं हेही अनुभवलं. जितका जंगलाच्या जवळ गेलो तितकाच प्रगल्भ होत गेलो. निसर्गात प्रत्येक गोष्ट माणसाला विचार करायला लावणारी आहे. आपल्याकडे फक्त तेवढा धीर आणि नवीन जाणून घ्यायची इच्छा हवी.’ वरुण सांगतो की, आतापर्यंत मित्रांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यातली सर्वात महत्त्वाची म्हणजे, जंगलातला प्रत्येक घटक हा समान असतो. लहान मुंगीपासून ते भीमकाय हत्तीपर्यंत, निसर्गात सर्वाना समान दर्जा असतो. गरज आहे ती आपण आपलं निसर्गाबद्दल असलेल कुतूहल जागृत ठेवण्याची.
हे झालं छंद म्हणून फोटोग्राफी करण्याबद्दल, पण हेच क्षेत्र कित्येक जण करियर म्हणून निवडतात. पुण्याचा विश्वतेज पवार हा नवोदित प्रोफेशनल वाइल्डलाइफ फोटोग्राफर या संदर्भात म्हणतो, ‘मला आधीपासूनच जीवशास्त्राची आवड होती. अकरावीपासूनच मी फोटोग्राफीला सुरुवात केली. मी सुरुवातीपासूनच पक्षीविश्वाकडे आकर्षति व्हायचो म्हणून सुरुवातही त्यांच्यापासूनच झाली. पण सहा महिने फोटोग्राफी करून माझ्या लक्षात आलं की, पक्ष्यांचे फोटो काढणं आणि त्यांच्याबद्दल वैज्ञानिक माहिती असणं यात खूप फरक आहे. म्हणून मी पुढचे सहा महिने मी फक्त हातात दुर्बीण घेऊन पक्ष्यांचा अभ्यास केला.’ आपला निसर्गाकडे पाहायचा दृष्टिकोन केव्हाही स्वार्थी नसलेलाच चांगला. आपल्याला ज्या विषयाची फोटोग्राफी करायची आहे, आधी तो विषय म्हणजेच तो प्राणी अथवा पक्षी आपण समजून घेतला पाहिजे. आपण त्याला कुठलाही त्रास होऊ न देता हे सगळं करावं, त्याच्या नसíगक अधिवासात आपण लुडबुड न केलेलीच बरी. लोकांनी जंगलात  काही नियमांप्रमाणे वागणं भाग आहे, मग तो कोणता फोटोग्राफर असो वा साधा पर्यटक. हे विश्वतेज ठासून सांगतो.
सध्या अनेक वेळा फोटोग्राफर आणि वन्य जीव अभ्यासक यांच्यातील वाद अगदी शिगेला पोहोचतात. फोटोग्राफर केवळ क्रेझ म्हणून जंगलात ठरावीक उद्देशाने जातात. वन्य जिवांच्या अधिवासात लुडबूड होते म्हणून अभ्यासकांचा विरोध असतो. हा वाद होऊ न देता एकमेकांकडून काय शिकण्यासारखं आहे ते पाहावं. कारण या दोन गोष्टींचा सुवर्णदुवा साधला गेल्याशिवाय आपण निसर्ग संवर्धनाकडे वाटचाल करू शकणार नाही. इट हॅज टू बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ.. बायनॅक्युलर अँड कॅमेरा.

जंगलचा आवाज अंतर्मुख होऊन ऐकण्यासाठी रेकॉर्डिगमधून वेळ काढून मी जातो. – केयूर बर्वे
पक्षांचे नुसते फोटो काढणं आणि त्यांच्याबद्दल माहिती असणं यात फरक आहे. म्हणून आधी दुर्बिण हाती घेतली. – विश्वतेज पवार

या सगळ्यांपेक्षा एक वेगळाच मुद्दा मांडला तो नवी मुंबईचा तालवाद्य वादक केयूर बर्वे याने. विशेष म्हणजे तो जगविख्यात पर्कशनिस्ट उस्ताद तौफिक कुरेशी यांचा शिष्य आहे. रेकॉìडगमधूनही तो वेळ काढून जंगलात िहडायला जातो. त्याचा जंगलाबद्दल असलेला दृष्टिकोन त्याच्याच शब्दात असा – ‘तसं बघायला गेलं तर मला जंगलात फिरायची आवड अगदी लहानपणापासूनच आहे. पण ती कुठल्याही प्राण्या-पक्ष्याबद्दल असलेली क्रेझ म्हणून नाही, तर त्या जंगलाचा आवाज अंतर्मुख होऊन ऐकण्यासाठी. खूपशा तालवाद्यांचा उगम हा आफ्रिकेतील माली या विभागामधून जंगलातील आदिवासींकडूनच झाला. आजही आपल्याला जागतिक संगीतावर आफ्रिकन संगीताची छाप दिसून येते. माझ्या मते, कुठल्याही कलाकाराला चांगल्या रचना किंवा कल्पना दोनच ठिकाणी सुचतात, एक तर बाथरूममध्ये आणि दुसरं म्हणजे जंगलात! जंगलात जाऊन आल्यानंतर नवीन काम करायची जिद्द आणि उत्साह तर मिळतोच पण नवीन उमेदही मिळते. दर वेळी जंगलात प्राणी आणि पक्षी पाहायला जाण्यापेक्षा, एक दिवस तिकडे विरंगुळा म्हणून तिकडची शांतता अनुभवायला जायला हरकत नाही. पण हे सगळं करताना आपण जंगलातील शांततेचा, तिथल्या वातावरणाचा भंग तर करत नाही ना, याचीपण काळजी घेणं गरजेचं आहे. जंगल हे नवनव्या कलाकृतींचा उगमस्रोत आहे आणि त्याचं संवर्धन होणंही तितकंच गरजेचं आहे.’
हल्ली वाढतं पर्यटन, फोटोग्राफीच्या नादापायी होणारा कोअर झोनमध्ये शिरकाव या गोष्टींचा त्रास वन्यजीवांना खूपदा होतो. यासाठीच प्रत्येकाने आपला जंगलाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं भाग आहे. जंगलात असताना किती गोंगाट होईल, फोटोग्राफी करताना आपण त्या प्राण्याचा अधिवास उद्ध्वस्त तर करत नाही ना, या गोष्टींकडेही प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे.    अनेकदा पर्यटक वाघ किंवा हत्ती बघायच्या नादात किती तरी पक्ष्यांच्या, कीटकांच्या, झाडांच्या प्रजातींकडे दुर्लक्ष करतात. प्रथमत: आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की, फक्त वाघ म्हणजे जंगल नाही, ती एक संपूर्ण साखळी आहे आणि तिच्यातला प्रत्येक घटक सारखाच महत्त्वाचा आहे. या साखळीमध्ये जसे प्राणी-पक्षी महत्त्वाचे, तसाच त्यांचा अधिवासही महत्त्वाचा असतो. त्यामध्ये मानवी हस्तक्षेप हा किती प्रमाणात होतो ते आपल्यावर अवलंबून आहे.

जंगलचा आवाज अंतर्मुख होऊन ऐकण्यासाठी रेकॉर्डिगमधून वेळ काढून मी जातो. – केयूर बर्वे

आज भारताच्या क्षेत्रफळाच्या फक्त साडेचार टक्क्यांपेक्षा कमी प्रदेश वन्य जिवांसाठी संरक्षित प्रदेश म्हणून गणला जातो. पण जर त्यातून वाळवंटी प्रदेश आणि समुद्रकिनाऱ्याचा प्रदेश वगळण्यात आला, तर उर्वरित जंगलांचा प्रदेश हा भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या एका टक्क्यापेक्षा कमी आहे. तशातही हा प्रदेश अनेकदा डेव्हलपमेंटल प्रोजेक्टमध्ये अडथळा असल्याचं दाखवण्यात येतं. अशा वेळी सामान्य माणसांचा जंगलाबद्दल असलेला दृष्टिकोन, त्याच्या संवर्धनासाठी सामान्यांकडून उचलली जाणारी पावले यांमधून फरक घडून येऊ शकतो. आज कित्येक जण फेसबुकच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाइक्स मिळवण्यासाठी प्राण्यांचे-पक्ष्यांचे फोटो अपलोड करत असतात. त्यात गर असे काहीच नाही, पण जर त्या फोटोसोबत प्राण्या-पक्ष्यांबद्दल माहिती लिहिली (उदा. त्याचं वैज्ञानिक नाव, त्याचा अधिवास, अन्नसाखळीमधील स्थान, त्याचा भारतातील आढळ इत्यादी.) तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि आपणपण निसर्गाबद्दल सामन्यांच्या मनात जागरूकता निर्माण करू शकतो. निसर्गाने तर आपल्याला घडवलं, आता आपण निसर्गासाठी काय करतो ते महत्त्वाचं आहे.