डोंबिवली शहरात रस्त्यावर निवारा शोधणाऱ्या बेघरांना निवारा मिळावा म्हणून शासनाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या रात्र निवारा केंद्रात राजरोसपणे पैसे उकळण्याचे उद्योग सुरू झाल्याचे वृत्त आहे. डोंबिवलीत एकतानगर येथे गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेतर्फे रात्र निवारा केंद्र चालविले जाते. शहरातील रस्त्यांच्या कडेला तसेच पदपथांवर निवारा शोधणाऱ्यांना या केंद्रात सुरुवातीच्या काळात निवारा मिळवून देण्यात आला. मात्र, येथेही आता ठेकेदारी सुरू झाली आहे. या केंद्राच्या ठेकेदाराने सुस्थितीत असलेल्या बेघरांना निवारा केंद्रात आसरा देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा उद्योग सुरू केल्याची माहिती हाती आली आहे.या रात्र निवारा केंद्रात तळ व पहिला माळा अशी व्यवस्था आहे. त्यामध्ये कार्यालयासह एकूण बारा खोल्या आहेत. यामधील सात ते आठ खोल्यांमध्ये सतत ठरावीक व्यक्ती वास्तव्य करत असतात, असे येथील काही रहिवाशांनी सांगितले. ठेकेदार या ठिकाणी खोलीतील भाडेकरूंकडून पैसे वसूल करण्यासाठी येतो. त्यानंतर तो या ठिकाणी फिरकत नसल्याचे सांगण्यात आले. या निवारा केंद्रात ज्यांना कोठेही आसऱ्यासाठी जागा नाही, जे बेघर आहेत त्यांना वास्तव्य देण्यात यावे, असे नियम आहेत. तरीही डोंबिवलीतील घरातून भांडून बाहेर पडलेल्या काही व्यक्ती ठेकेदारास पैसे देऊन या ठिकाणी वास्तव्य करू लागल्याचे सांगितले जाते. निवारा केंद्राला पाणी सोडण्यासाठी अनेक वेळा केंद्रातील एका आजोबांना दुसऱ्या माळ्यावर पाठवले जाते. रात्री आठ वाजता निवारा केंद्र बंद करण्यासाठी ओळखीच्या माणसाला, केंद्रातील रहिवाशाला ठेकेदाराकडून सांगितले जाते. अनेक खोल्यांमधील कचरा अनेक दिवस उचलला जात नाही. त्यामुळे खोलीत दरुगधी सुटते. कोणतीही स्वच्छता येथे ठेवली जात नाही. निवारा केंद्रात एक रजिस्टर ठेवले जाते. तेथे येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद केली जाते. निवारा केंद्रात पैसे घेतले जातात याचा कोणाताही पुरावा केंद्रातील कार्यालयात ठेवला जात नाही, असे रहिवाशांनी सांगितले. केंद्रात राहणाऱ्या एम. आर. नायक यांच्याकडून गेल्या जून महिन्यापासून दरमहा पाचशे रुपयांप्रमाणे आठ हजार पन्नास रुपये ठेकेदाराने वसूल केल्याची तक्रार ‘ग’ प्रभागाच्या सभापती व नगरसेविका कोमल निग्रे यांच्याकडे करण्यात आली आहे. सभापती कोमल निग्रे यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले की, ‘रात्र निवारा केंद्र बेघरांची सोय करणे आवश्यक असताना तेथे ठेकेदाराकडून चांगल्या सुस्थितीत असलेल्या नागरिकांना पैसे देऊन प्रवेश दिला जातो. काही वेळा ठेकेदार निवारा केंद्रातील नागरिकांना संघटित करून काही दानशूर मंडळींकडे मी निवारा केंद्र चालवतो, वीज देयके भरा, मदत करा म्हणून मदत मागण्यासाठी जातो. ठेकेदाराच्या या कृत्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आपण आयुक्तांना पत्र दिले आहे’, असे निग्रे यांनी सांगितले. प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करून निवारा केंद्रात गैरप्रकार आढळल्यास ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल.