शहर पोलीस दलाकडे सध्या उपयुक्त असे फक्त दोनच व्हिडिओ कॅमेरे असून ‘लाईट सोर्स’ अभावी ते सायंकाळनंतर कुचकामी ठरत आहेत. आकस्मिक परिस्थती उद्भवल्यास चित्रीकरण कसे करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चोरी, दरोडा, घरफोडी, खून तसेच कायदा व सुव्यवस्थेची स्थिती उद्भवल्यास पुरावा म्हणून घटनास्थळाची छायाचित्रे काढली जातात. पोलीस मार्गदíशकेनुसार १९६२ मध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर या चार ठिकाणीपोलिसांचा छायाचित्रण विभाग अस्तित्वात आला. शहर पोलीस दलातील व्हिडिओ विभागात सध्या दहा व्हिडिओ कॅमेरे आहेत. मात्र, त्यापैकी केवळ दोनच उपयुक्त आहेत. दोन व्हिडिओ कॅमेरे आहेत, त्यांना सायंकाळनंतर ‘लाईट सोर्स’ आवश्यक असतात. मात्र, ते या विभागाजवळ नसल्याने सायंकाळनंतर कुचकामी ठरतात. आकस्मिक परिस्थती उद्भवल्यास चित्रीकरण कसे करणार? असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. फ्लड लाईट्स असल्यास त्याच्या प्रकाशात काही अंतरापर्यंत त्याने चित्रीकरण करता येते. मात्र, इतर ठिकाणी ‘नाईट व्हिजन’ नसल्याने हे दोन कॅमेरेसुद्धा कुचकामी ठरत आहेत.
चित्रीकरणाची सीडी तयार करण्याची सोयही या विभागात नाही. सीडी तयार करायची असेल तर खासगी दुकानदाकडून ती प्रत्येकवेळी तयार करून आणावी लागते. त्यासाठी कॅमेराही सोबत नेण्याची हमाली करावी लागते. एक संगणक तसेच सीडी तयार करणाऱ्या यंत्रणेचा प्रस्ताव चार वर्षांपूर्वी देण्यात आला होता. पुरेशा निधीअभावी तो धुळखात पडला आहे. २००८मध्ये राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कॅमेरा दिला गेला होता. आज हे सर्व कॅमेरे नादुरुस्तच आहेत. तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त माधव कर्वे यांनी वैयक्तिक लक्ष देऊन नागपूर शहराचा व्हिडिओ व छायाचित्रण विभाग अद्यावत केला. राज्यात नागपुरातील छायाचित्रण (फोटोग्राफी) विभाग पहिल्या क्रमांकाचा ओळखला जातो. त्यानंतर पुणे व ठाण्याचा क्रमांक लागतो. नागपुरातील छायाचित्रण विभागात सध्या चार अद्यावत डिजीटल कॅमेरे आहेत. सहा कर्मचारी असून त्यापैकी चार पोलीस आहेत. २३ पोलीस ठाणे व २५ लाख लोकसंख्येच्या नागपूर शहरात या कर्मचाऱ्यांना छायाचित्रण करावे लागते. शहरात वर्षांतून किमान चारवेळा तरी मोठा बंदोबस्त असतोच. अशावेळी व्हिडिओ कॅमेरे गरज भासल्यास भाडय़ाने घेण्याची परवानगी पोलीस निरीक्षकांना देण्यात आली आहे.

२३ पोलीस ठाणे व २५ लाख लोकसंख्येच्या नागपूर शहरात दोनच व्हिडिओ कॅमेरे, ‘लाईट सोर्स’ अभावी सायंकाळनंतर कुचकामी. छायाचित्रणासाठी केवळ सहा तर व्हिडिओ विभागात केवळ चार अप्रशिक्षित कर्मचारी या परिस्थितीस निधीचा अभाव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनास्था कारणीभूत असल्याचे जाणकारांना वाटते. लोकसंख्या वाढ, औद्योगिकरण यामुळे शहरे, गावे विस्तारत चालली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलालाही अद्यावत व्हावेच लागणार आहे. त्यात ‘चल रहा है चलने दो’ हा दृष्टीकोन अडथळा ठरू शकतो.