राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्यामध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. तर, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

“फक्त टोमणे, आरोप-प्रत्यारोपात वर्ष घालवले. ज्यांनी मतदारांशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, त्यांना लोकांनी नाकारलं आहे. मतदारांशी प्रतारणा केलेल्यांना जनतेनं घरी बसवलं. असेही घरी बसण्याची सवय त्यांना होतीच,” असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

हेही वाचा : “इंडिया आघाडीवर मंथन करणे गरजेचे”; नितीश कुमार आणि ओमर अब्दुल्लांच्या ‘त्या’ वक्तव्यांवर ठाकरे गटाची उघड नाराजी!

“ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदारांनी कौल दिला आहे. यासाठी मतदारांचे आभार मानतो. गेल्या वर्षभराच्या कालावधीत विकासकामे आणि महाविकास आघाडीनं थांबवलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचं काम आम्ही केलं. सर्वांगीण विकास करण्याचं धोरण आम्ही आखलं. राज्यातील शेतकरी, उद्योजक, महिला, तरूण, कामगारांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारनं केलं. ‘शासन आपल्या दारी’ योजना राबवण्यात आली,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

हेही वाचा :  लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढविणार- मुख्यमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाविकास आघाडीपेक्षाही अधिक सरपंच आणि सदस्य महायुतीचे निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्र्यांनी जनतेला न्याय देण्याचं काम केलं,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.