सकाळच्या कुंद वातावरणाचा अथवा रात्रीचा धीरगंभीर आभास देणारी प्रकाशयोजना तुम्हाला हवीय? मुलांना अभ्यासासाठी पूरक व उत्साहदायी किंवा तरुणांना पार्टी थीमप्रमाणे रोषणाई? विविध १.६० लाखांहून अधिक रंग, प्रकाश देऊ शकणारे दिवे फिलिप्स सध्या तयार करत आहे.
सध्या अशा प्रकारच्या दिवेनिर्मितीवर संशोधन सुरू असून येत्या दोन महिन्यांत हे दिवे बाजारात उपलब्ध होतील. अर्थातच या दिव्यांचे दर अन्य दिव्यांच्या तुलनेत अधिक असतील. त्याचबरोबर दूरध्वनीवरून अशा दिव्यांची रंगसंगती, प्रकाशाचे प्रमाणही निश्चित करून ते वापरण्यावरही सध्या संशोधन सुरू आहे.
भारतीय विद्युत उपकरण बाजारपेठेत गेल्या ८५ वर्षांपासून कार्यरत फिलिप्सतर्फे ही किमया साधली जात आहे. याबाबत फिलिप्स लायटिंग सोल्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष चितळे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, घरात-कार्यालयात दिव्यांची संख्या व जागा न बदलता हवी तशी प्रकाशीय वातावरणनिर्मिती शक्य करणाऱ्या दिवेनिर्मितीवर कंपनीचे गेल्या काही दिवसांपासून संशोधन सुरू आहे. एलईडी प्रकारातील हे दिवे येत्या काही महिन्यांतच भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.
चितळे यांनी सांगितले की, आज दिव्यांचा उपयोग केवळ प्रकाशासाठीच होत नसून ग्राहकाला हवे त्या वेळी हव्या त्या वातावरणाची निर्मिती यामार्फत करून देणे हे केवळ एलईडी तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. एलईडी दिव्यांच्या वापराचे प्रमाण सध्या ५० टक्के असताना फिलिप्समध्ये या प्रकारच्या दिव्यांचा विक्री व्यवसाय हा ७० टक्क्यांपर्यंत आहे. गेल्या वर्षभरात कंपनीने दिव्यांच्या या श्रेणीत ३५० हून अधिक उत्पादने बाजारपेठेत आणली.
एलईडी दिव्यांच्या किमती अद्यापही महाग असल्याबद्दल ते म्हणाले, सध्या या तंत्रज्ञानावर सरकारही अधिक भर देत आहे. जसजसा या प्रकारच्या दिव्यांचा वापर ग्राहकांकडून अधिक होईल तसतशा त्याच्या किमतीही कमी होतील. त्याचबरोबर या प्रकारातील दिवेनिर्मितीनेही देशांतर्गत गेल्या काही दिवसांमध्ये वेग पकडला असल्याचेही ते म्हणाले.
देशात होत असलेल्या एकूण २.५० लाख मेगाव्ॉट ऊर्जा वापरापैकी ४५,००० मेगाव्ॉट वीज ही विद्युत दिव्यांसाठी खर्ची पडते. आजही भारताला २०,००० मेगाव्ॉट विजेचा तुटवटा भासतो. देशभरात १०० टक्के एलईडी दिव्यांचा वापर सुरू झाला तरी ही तफावत सहज भरून निघेल.
फिलिप्सची स्वत:ची अद्ययावत दालने देशभरात १५० हून अधिक असून येत्या डिसेंबर २०१५ पर्यंत ती २०० करण्याचा मानसही चितळे यांनी व्यक्त केला. दिव्यांबद्दल सर्व काही असे या दालनांमध्ये एकछत्र समाधान देणारे स्वरूप असेल.