दरम्यान आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ५.६ टक्के दराने वाढेल असे भाकीत सिटी बँकेने आपल्या संशोधन अहवालात केले आहे. जरी आजची अर्थव्यवस्थेविषयक आकडेवारी फारशी उत्साहवर्धक नसली तरी त्यात सुधारणा नक्कीच अपेक्षित आहे. रखडलेल्या प्रकल्पांना निवडणुकीनंतर मंजुरी मिळण्याची आशा, सुधारत असलेली अमेरिकेची अर्थव्यवस्था यांचा परिणाम भांडवली वस्तूंची मागणी वाढून एकूण औद्योगिक उत्पादनात वाढ होणे अपेक्षित असल्यामुळे हे घडेल असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नुकताच एचएसबीसी या दुसऱ्या परकीय गुंतवणूकविषयक सल्ला देणाऱ्या बँकेने भारताचा एप्रिलसाठीचा ‘परचेसर मॅनेजर इंडेक्स’ किंवा ‘पीएमआय’ ५१.३ असेल असे म्हटले आहे. मार्च महिन्याच्या ‘पीएमआय’ मध्ये जरी बदल दिसत नसला तरी त्यात कमी न होणे हे सकारात्मक मानण्यात येत आहे. मार्च महिन्यात भारताचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक ४.५ टक्क्यांनी वाढला तर फेब्रुवारी महिन्याच्या निर्देशांकात २.५ टक्केच वाढ दिसून आली. जर निवडणुकीत बहुमताचे स्थिर सरकार आले तर अल् निनो परिणामाच्या नकारात्मकतेवर आíथक सुधारणांच्या सकारत्मतेने मात करणे शक्य आहे. असेही सिटीबँकेच्या या अहवालात म्हटले आहे. पायाभूतक्षेत्रातील रखडलेले प्रकल्प व मंदावलेली वाहन विक्री यामुळे मार्च महिन्यांच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात १.९ टक्के घट होईल असे अनुमानही सिटी बँकेने या अहवालातून केले आहे.