करोनामुळे भारतीय अर्थव्यवस्था थोड्या काळासाठी खाली आली असताना आता त्यात सातत्याने सुधारणा होत आहे. आता जागतिक वित्तीय सेवा कंपनी गोल्डमॅन सॅचने देखील २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. वॉल स्ट्रीट ब्रोकरेज गोल्डमन सॅचने २०२२ मध्ये भारताचा जीडीपी ९.१ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. २०२० मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत सात टक्क्यांची मोठी घसरण झाल्यानंतर, गोल्डमन सॅचने २०२१ मध्ये अर्थव्यवस्था आठ टक्के आणि २०२२ मध्ये ९.१ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी, भारताचा आर्थिक विकास दर ३१ मार्च २०२२ पर्यंत ११.१ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. २०२१-२२ मध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा दर ८.५ टक्के असेल असे म्हटले आहे. तर २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये हा दर आणखी ९.१ टक्क्यांपर्यत वाढणार असल्याचे गोल्डमन सॅचने म्हटले आहे. २०२१ या आर्थिक वर्षात करोनामुळे जीडीपी मध्ये ७.३ टक्क्यांपर्यंत घट झाली होती. पण २०२१-२२ मध्ये बेस इफेक्टमुळे ती अधिक वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने २०२१-२२ मध्ये जीडीपी ९.५ टक्के वाढीची अपेक्षा केली आहे आणि परिस्थिती सामान्य झाल्यावर ती ७.८ टक्क्यापर्यंत पर्यंत कमी होईल असे म्हटले आहे. गोल्डमन सॅच आता भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबद्दल नेहमीपेक्षा अधिक सकारात्मक आहे. कंपनीने आपल्या अलीकडील 'GS Macro Outlook 2022: The Long Road to Higher Rates' या अहवालामध्ये अंदाज व्यक्त केला आहे की २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था आठ टक्क्यापर्यंत वर येऊ शकते. "आम्ही २०२२ मध्ये वाढीसाठी खपाचे महत्त्वपूर्ण योगदान असण्याची अपेक्षा करतो, कारण करोना परिस्थितीत लक्षणीय सुधारणा आणि लसीकरणातील लक्षणीय प्रगतीसह अर्थव्यवस्था पूर्णपणे पुन्हा सुरू झाली आहे," असे गोल्डमन सॅचने अहवालात म्हटले आहे. या अहवालात आम्हाला सरकारकडून भांडवली खर्च वाढवण्याची अपेक्षा आहे. याशिवाय खासगी कॉर्पोरेट क्षेत्रातून गुंतवणुकीत हळूहळू वाढ होत असून गृहनिर्माण गुंतवणुकीतही वाढ झाली आहे, असेही म्हटले आहे. अमेरिकेच्या ब्रोकरेजने आर्थिक २०२३ मधील वाढीचा आकडा जास्त असण्याचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे त्याच्या विश्लेषकांना बेस इफेक्ट संपल्यानंतरही वाढीची अपेक्षा आहे. याआधी ब्रिटीश ब्रोकरेज बार्कलेजच्या विश्लेषकांनी सांगितले की २०२२ या आर्थिक वर्षात वाढ १० टक्क्यांवर येईल आणि तीच २०२३ मध्ये ७.८ टक्क्यांपर्यंत पर्यंत कमी होईल. गोल्डमन सॅचने सांगितले की, जसजशी वाढ होत जाईल, तसतसे आरबीआय आपले धोरण सामान्यीकरण सुरू करेल आणि २०२२ मध्ये ०.७५ टक्क्यांची संचयी दर वाढ अपेक्षित आहे. आरबीआयचे चार-टप्प्यातील धोरण सामान्यीकरण सध्या प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. पुढील वर्षाच्या उत्तरार्धात चलनवाढीनंतर महागाई कमी होईल आणि परिणामी, रिझर्व्ह बँकेकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असे अहवालात म्हटले आहे. गोल्डमॅन सॅचच्या विश्लेषकांनी महागाई दर २०२१ मध्ये ५.२ टक्क्यांवरुन २०२२ मध्ये ५.८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा केली आहे.