गेले १२ दिवस जागतिक स्तरावरून बेपत्ता असलेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या एमएच ३७० विमानाची शोधमोहीम सुरू असताना, ‘व्हिजिट मलेशिया २०१४’च्या प्रचार-प्रसाराची मोहीम पुढे रेटताना, ‘अपघात तर होतातच, पण त्याने सर्व काही थंडावत नसते, द शो मस्ट गो ऑन’ या थाटात टुरिझम मलेशियाच्या मुंबईतील रोड शोला मंगळवारी सुरुवात झाली. ताज्या घटनेचे मलेशियातील पर्यटन व्यवसायावर कोणतेही सावट नसल्याचा दावा पत्रकारांशी संवाद साधताना करतानाच, तेथील पर्यटन विभागाच्या माहितीशून्यता आणि कोरडय़ा संवेदनांचीही या निमित्ताने जाणीव झाली.
मलेशियाच्या आर्थिक विकासात लक्षणीय योगदान असलेल्या पर्यटन उद्योगाची महत्त्वाकांक्षी ‘व्हिजिट मलेशिया २०१४’ ही मोहीम खूप आधीपासून आखण्यात आली असून, त्या निमित्ताने मुंबईतील नियोजित प्रचार दौऱ्याची आखणीही काही महिन्यांआधीच झाली आहे. त्यामुळे ताज्या विमान दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर त्यात बदल शक्य नव्हता, असे टुरिझम मलेशियाचे महासंचालक मिर्झा मोहम्मद तय्यब यांनी सांगितले. तथापि बेपत्ता विमानाविषयी प्रसारमाध्यमांमधून जे समोर येते तितकी आणि तेवढीच आपल्यापाशी माहिती असून, या व्यतिरिक्त अन्य काहीही आपल्याकडे सांगण्यासारखे नसल्याचे त्यांनी सांगितले. तथापि ‘व्हिजिट मलेशिया’ या नियोजित मोहिमेसाठी संपूर्ण मलेशियातील पर्यटन, हॉटेल्स, थीम पार्क, आदरातिथ्य, प्रवास व सहल आयोजन क्षेत्राने प्रचंड मोठी गुंतवणूक केली असून, या मंडळींना सारे काही सुरळीत सुरू आहे ही उमेद देण्यासाठी हा नियोजित प्रचारदौऱ्याचा कार्यक्रम ठरल्या वेळी होणे आवश्यक होते, असे मिर्झा यांनी सांगितले.
दरसाल चार कोटींहून अधिक प्रवासी हाताळणाऱ्या क्वालालम्पूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा तसेच संपूर्ण मलेशियातील सुरक्षा व्यवस्था पाहता, जगातील सर्वात सुरक्षित व शांत ठिकाणांमध्ये त्यांचे निश्चितच वर असून, ताजी घटना एक अपवाद केवळ आहे, असे म्हणत मिर्झा यांनी या संबंधाने सविस्तरपणे बोलण्यास आपण सक्षम नसल्याचे स्पष्ट केले. याच ओघात त्यांनी २०१४ सालात मलेशियात आखण्यात आलेल्या विविध पर्यटन प्रोत्साहनपर खाद्य, क्रीडा, खेळ, विक्री उत्सवांची जंत्री पत्रकारांपुढे ठेवली. ‘व्हिजिट मलेशिया २०१४’ निमित्ताने जगभरातून पर्यटकांचा ओघ १२ टक्क्यांनी वाढून २८० लाखांवर जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मलेशियात दाखल होणाऱ्या पर्यटकांमध्ये भारतीयांचे प्रमाण पहिल्या दहात असेल आणि २०१४ सालात त्यांची संख्या सात लाखांपल्याड जाण्याबद्दल ते आश्वस्त दिसले. २०१३ सालात मलेशियात जाणाऱ्या भारतीयांची संख्या सहा लाखांच्या आसपास होती. बेपत्ता विमानाची घटना ताजी असतानाही मलेशियाच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत अथवा मलेशिया एअरलाइन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येतही कोणतीही घट दिसून येत नसल्याचे, टुरिझम मलेशियाच्या भारतातील कार्यालयाचे संचालक मनोहरन पेरियासामी यांनी सांगितले. व्हिसा इच्छुकांच्या अर्जात दुहेरी संख्येने वाढ कायम असल्याचे त्यांनी सांगितले.