भक्ती रसाळ
योग्य विमा कवचाचे गणित मांडण्याच्या पद्धतींचा अभ्यास करणे आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे. विमासुरक्षा कवच गिऱ्हाईकांच्या आवश्यक गरजेनुसार घेतले गेले नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या भविष्यावर नकारात्मक परिणाम होतो. विमा रक्कम (कवच) गरजेपेक्षा जास्त किंवा कमी असणे अशा दोन्ही परिस्थितीमध्ये आर्थिक नियोजनाची घडी विस्कटते.
योग्य विमा रकमेचे गणित ढोबळ मानाने तीन पद्धतीने मांडता येते.
१) ह्युमन लाइफ व्हॅल्यू
२) गरजसापेक्ष मूल्यमापन
३) कौटुंबिक खर्चावर आधारित विमा कवच
बहुतांश विमा कंपन्यांच्या संकेतस्थळावर ग्राहकांना साध्या सोप्या पद्धतीने वार्षिक उत्पन्नाच्या किमान दहा पट विमा रक्कम घेण्याकरता प्रोत्साहित केले जाते.ग्राहकांना विनासायास योग्य विमा रकमेचे समीकरण मांडता यावे याकरता वार्षिक मिळकत, ग्राहकाची एकूण बचत, कर्जाची परतफेड या आर्थिक बाबींवर आधारित तयार गणक (कॅल्क्युलेटर) संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सामान्य गुंतवणूकदार टर्म विमा रक्कम ठरवताना उपलब्ध साधनांद्वारे स्वत:च आर्थिक निर्णय घेताना आढळतो. परंतु योग्य विमा रक्कम ठरवताना ग्राहकाच्या आर्थिक घटकांचा सखोल विचार करणे आवश्यक आहे. विमा रक्कम ठरवताना ग्राहकाचा वार्षिक खर्च आणि वार्षिक उत्पन्न या दोन्ही बाबींचा विमा रकमेशी अपेक्षित गरज ठरवताना वस्तुनिष्ठ विचार मांडावा लागतो.
कुटुंबप्रमुखावर आर्थिकदृष्टया अवलंबून असणाऱ्या सदस्यांचे वय, ग्राहकाचे निवृत्तीचे वय, चलनवाढ, एकूण गुंतवणुकीची सध्याची रक्कम. चालू व्याजदर, कुटुंबप्रमुखाचे वार्षिक उत्पन्न, भविष्यात उत्पन्न वाढू शकण्याची शक्यता, अवलंबून असणाऱ्या कुटुंब सदस्यांची आर्थिक लक्ष्ये, त्यांची वयानुसार बदलत जाणारी वार्षिक खर्चाची गरज असा अनेक आर्थिक घटकांचा योग्य आणि अपेक्षित विमा रक्कम ठरवताना विचार होतो.
करोनाकाळात मृत्युदाव्यांद्वारे समोर आलेली सरासरी विमारक्कम ही तुटपुंजी आहे हे प्रकाशाने लक्षात आले. ग्राहकांनी गुंतवणुकीपेक्षा विमा कवचाकडे सुरक्षाकवच याच दृष्टिकोनातून बघणे कुटुंबाच्या हिताचे आहे. कुटुंबप्रमुख किंवा कमावता सदस्य कुटुंबाकरता उत्पन्न निर्माण करणारी मालमत्ता असते. या मालमत्तेचे मूल्यांकन ठरावीक काळाने चलनवाढ, व्याजदर, गृहकर्ज, वाहनकर्ज तसेच वाढती आयुर्मर्यादा या घटकांनुसार बदलत राहते. अर्थात आयुर्विम्याची गरज कुटुंबांच्या जीवन टप्प्यानुसार बदलत असते. दुर्दैवाने आयुर्विमा योजना कित्येक दशके संकुचित दृष्टिकोनातून खरेदी-विक्री केल्याने एकंदरीत सामाजिक आर्थिक असुरक्षितता निर्माण झाली आहे. करोनाकाळातील मृत्यदाव्यांच्या विश्लेषणातून ही त्रुटी प्रकर्षांने लक्षात येते.
ग्राहकांनी विमा रक्कम ठरवताना लक्षात घेण्याच्या नोंदी
१) गुंतवणूकदारांची सध्याची एकंदरीत एकत्रित गुंतवणूक मूल्य, २) एकूण चालू विमा कवच, ३) अपेक्षित वार्षिक मिळकतीतील वाढ , ४) चालू चलनवाढ, ५) आपल्या पश्चात जोडीदाराचे आयुर्मान, ६) उर्वरित कर्जधारण, ७) स्वत:चा वार्षिक खर्च, ८) चालू प्राप्तिकराचा दर, ९) कुटुंबातील सदस्यांची आर्थिक लक्ष्ये आयुर्विम्याची गरजसापेक्ष रक्कम ठरवताना वरील सर्व बाबींची नोंद अत्यावश्यक ठरते. ज्यावर आधारित सुरक्षा कवच संपूर्ण आर्थिक नियोजनाची भक्कम बैठक असते. गुंतवणूकदारांची जीवनलक्ष्ये अबाधित राहण्यासाठी नियोजनाची पायरी डोळसपणे चढावी लागते.
लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आणि व्यावसायिक विमा सल्लागार
bhakteerasal@gmail. Com