जिल्ह्यत परतीच्या पावसाने मोठय़ा तलावांसह बंधारे, नद्या तुडुंब भरल्याने एकाच दिवशी तीन ठिकाणी सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. कामखेडा येथील एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा तर शिरूरघाट येथे दोन मुलांचा आणि धायगुडा पपळा येथे एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. तर अन्य दोन घटनांत दोघांचा मृत्यू झाल्याने रविवारी दिवसभरात आठ जणांना मृत्यूने कवटाळले. बीड जिल्ह्यत रविवारी तीन घटनांमध्ये सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. कामखेडा (ता. बीड) येथील इसाक उस्मान शेख यांच्या पत्नी परवीन शेख या गावालगत असलेल्या नदीवरील बंधाऱ्यावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासमवेत असलेली त्यांची मुलगी सानिया इसाक शेख (वय १३) ही पाय घसरून पाण्यात पडली. त्या पाठोपाठ जिशान शेख (वय १५) व अफान शेख (वय ११) हे दोघे भाऊदेखील पाण्यात पडल्यानंतर आई परवीन शेख यांनी पाण्यात उडी घेऊन तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता तिघांचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तीनही भावंडांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली असून, तिघेही बीड येथील सर सय्यद अहमद खान उर्दू शाळेत शिक्षण घेत होते. दुसरी घटना शिरूरघाट (ता. केज) येथे घडली असून, नदीवर पोहण्यासाठी गेलेले बापू विजयकांत लोंढे (वय १२) व साहेबराव लबाजी वैराळ (वय १२) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर धायगुडा पपळा (ता. अंबाजोगाई) येथील शांताबाई धर्मराज धायगुडे(वय ४५) या धुणे धुण्यासाठी तलावावर गेल्या असता त्या ठिकाणी पाय घसरून पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. तर टोकवाडी (ता. परळी) येथील विकास दत्ता जाधव (वय १५) याचा ऑटोरिक्षा पलटी झाल्याने मृत्यू झाला. तर बीडसांगवी (ता. आष्टी) येथील रावसाहेब डुकरे (वय ६५) या हॉटेलचालकास अज्ञात तरुणांनी केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे.