निश्चलनीकरणानंतर गव्हाच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम; तेल आणि तुपाच्या किमतीही भडकल्या हाती नव्या चलनातील पैसे मिळविण्यासाठी सध्या आटापिटा करणाऱ्या नागरिकांना तो मिळाल्यानंतरही पुन्हा नवा चलनचटका सोसावा लागणार आहे. निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये रवा, मैदा, तेल, तुपाच्या दराने मोठी उचल खाल्ल्यामुळे सर्वसामान्यांना रोटी, चपाती, ब्रेड आणि पावही महाग दराने खरेदी करावे लागणार आहे. हजार, पाचशेच्या नोटाबंदीचा निर्णय झाला आणि मोठा हलकल्लोळ सुरू झाला. किरकोळ व ठोक किराणा बाजारातही बरीच उलथापालथ झाली. परिणामी महागाईने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्याचा पहिला चटका अर्थातच ताटातील पोळी महागल्याचा आहे. बाजारात गव्हाचे दर क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत. सोबतच गव्हावर आधारित रवा, मैदा यांच्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थही महाग होऊ लागले आहेत. मैद्याच्या भाववाढीमुळे ५० किलोच्या कट्टय़ातून निघणाऱ्या उत्पादनात ३०० ते ५०० रुपयांचा नफा मिळायचा. मात्र. आता तेवढय़ाच दराने मैदा वाढल्याने धंदा तोटय़ात चालला आहे, असे बेकरीचालक आतिक शेख यांनी सांगितले. औरंगाबादेत १२५ ते १५० लहान मोठय़ा बेकरीज असून पदार्थाच्या उत्पादनातील सर्वच साहित्य कमी-अधिक प्रमाणात वाढल्याने व्यवसायात एकप्रकारे मंदीची लाट आली असल्याचे शेख म्हणाले. वाढलेल्या किंमती रवा क्विंटलमागे ३०० ते ४०० तर मैदा ५० किलोच्या कट्टय़ामागे २५० ते ३०० रुपयांनी वाढला आहे. परिणामी मैदा मुख्य घटक असलेल्या बेकरी पदार्थाच्या दरानेही उचल खाल्ली आहे. साधारणत: किरकोळ बाजारात सहा-आठ पावांची मिळणारी लादी सहा ते आठ रुपयांऐवजी दहा ते बारा रुपयांना मिळू लागली आहे. बेकरीतील पदार्थासाठी लागणारे तेल व तूपही १५ किलोच्या डब्यामागे २०० ते २५० रुपयांनी महागले आहे. गव्हाचे दर क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत. तेवढय़ाच दराने रवाही वाढला आहे. ३० रुपयांवरून ३४ रुपये किलो रवा विकला जात आहे. मैदाही कट्टय़ामागे २५० ते ३०० रुपये वाढला आहे. नवीन गहू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गव्हाचे दर हेच राहतील. नवीन गव्हासाठी किमान दोन महिने तरी वाट पहावी लागेल. - हरकिशन बडजात्या, व्यापारी