सरकारकडून घोषणांचा पाऊस पडला जातो. मात्र काम शून्य असून सध्या राज्यात जातीयवाद वाढवण्याचा शिस्तबद्ध कार्यक्रम सुरु आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.

काँग्रेस हा गोरगरिबांचा आवाज आहे. सध्या ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून त्यांचा आवाज पोहोचवायचे काम काँग्रेसला करायचे आहे. धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण गंभीर आहे. मात्र सरकारला त्याचे गांभीर्य नाही. त्याना भेटायला एक मंत्री सुद्धा गेला नाही आणि मृत्यूनंतर मंत्री पूनर्मूल्यांकन करण्याची घोषणा करतात. यावरून त्यांची मानसिकता लक्षात येत असल्याची टीका त्यांनी केली.

काँग्रेस सरकारच्या काळात शेतीमालाला आधारभूत किंमत दरवर्षी १० ते १२ टक्के वाढीव दिली जायची. मात्र भाजप सरकारने पाठीमागच्या तीन वर्षात फक्त दीड टक्के वाढ केली आहे. रस्त्याच्या बाबतीत फक्त डेडलाईन दिली. पण खड्डयातून मुक्तता झालेली नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून महागाई डोईजड झाली आहे. असे असताना ‘मी लाभार्थी’ अशी सरकारकडून जाहिरातबाजी केली जात आहे. सरकारचे खरे लाभार्थी रामदेव बाबा आहेत. म्हणून त्यांना ६०० एकर जमीन मोफत दिली. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर सरकारी केंद्रातून पतंजलीची उत्पादन विक्रीस परवानगी दिली. सरकारला शेतकरी, बेरोजगार, व्यापारी कोणाचेही देणे घेणे नाही. खोटारडं सरकार असून फसवणूक दमदार असल्याचा टोला चव्हाण यांनी लगावला.