सोयाबीन, ऊस आदी पिकांचे मोठे नुकसान

लातूर जिल्ह्य़ातील रेणापूर व निलंगा तालुक्यातील काही गावांमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतक ऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, शुक्रवारी कृषी विभागाकडून गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली.

रेणापूर तालुक्यातील बीटरगाव, कामखेडा, सुमठाणा, टाकळगाव व निलंगा तालुक्यातील आंबुलगा विश्वनाथ, आनंदवाडी या गावांमध्ये गारपीट झाली असून काढणीला आलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. शेंगा फुटून त्यातील दाणे जमिनीवर पसरले. उभा असलेला ऊस आडवा झाला. शेतक ऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीमुळे हिरावून घेण्यात आल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून ऐकायला मिळत आहे. शुक्रवारी या भागाच्या विमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पीकविमा कंपनीच्या करारानुसार ४८ तासांच्या आत नसíगक आपत्तीसंबंधीचा अहवाल पाठवला गेला पाहिजे. या संदर्भात विचारले असता कृषी अधीक्षक संतोष आळसे यांनी सांगितले, की अहवाल पाठवण्याची तयारी झाली आहे.

लातूर जिल्ह्य़ात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. तिसऱ्या दिवशीही १५ मंडळांत पावसाची हजेरी लागली आहे. गुरुवारी वादळी वाऱ्याने पावसाची अनेक गावांत सुरुवात झाली. शिरूर अनंतपाळ मंडळात १५, साकोळ ९, कासार बालकुंदा ३३, मदनसुरी १८, कासारशिरसी १९, नळेगाव २५, कारेपूर ३३, मातोळा ३२, किल्लारी २२ मि. मी. पाऊस झाला. औसा तालुक्यात १३.४३, रेणापूर तालुक्यात ८.२५ तर निलंगा तालुक्यात ११.१३ मि.मी. इतका पाऊस झाला. जिल्हय़ात सरासरी ४.८० मि.मी. इतका पाऊस गेल्या २४ तासांत झाला. यामुळे जिल्हय़ाची वार्षकि सरासरी ५१३.१८ मि.मी. वर पोहोचली आहे व वार्षकि सरासरीच्या ६४ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे.