सुहास सरदेशमुख

उत्साही शक्ती अवसानघातकी ठरण्याची शक्यता

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी हिंगोली, नांदेड उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उसने अवासान किती काळ टिकणार, असा प्रश्न आता विचारला जात आहे. या तिन्ही मतदारसंघात शिवसेनेला बरोबर घेतल्याशिवाय भाजपचा निभाव लागणे शक्य नाही. तर उस्मानबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मदत करण्याशिवाय भाजपकडेही पर्याय नाही, असे राजकीय चित्र दिसून येते. लातूर लोकसभा मतदारसंघात मात्र भाजपची शक्ती दिसत असली तरी या जिल्हय़ात भाजपमध्ये गटबाजी जपली जात आहे. शेजारच्या बीड जिल्हय़ातून या गटबाजीला खतपाणी घातले जात असल्याने हे चारही लोकसभा मतदारसंघ भाजपमय होतील हा दावा फुग्याला टाचणी मारण्याएवढा सोपा असल्याचे कॉंग्रेसचे नेते सांगत आहेत.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजपचे बहुतांश नेते अन्य पक्षातून आलेले. सूर्यकांता पाटील राष्ट्रवादीमध्ये होत्या, त्या भाजपवासी झाल्या. माजी खासदार शिवाजीराव माने यांनी तर शिवसेना, कॉंग्रेस असा प्रवास करुन राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुढे ते राष्ट्रवादीच्या दारातून भाजपमध्ये आले. माजी खासदार सुभाष वानखेडे शिवसेतून आलेले. शिवाजीराव जाधव, माहुरगडाचे महाराज श्याम भारती असे अनेकजण हिंगोली लोकसभा लढविण्यास इच्छूक आहेत. पण या नेत्यांची एकमेंकांना मदत करण्याच्या वृत्तीचा इतिहास पाहता भाजपला ही निवडणूक तशी सोपी असणार नाही. अगदी प्रत्येक पानासाठी कार्यकर्ता नेमूनही मतदान भाजपला होईल, असे सांगता येणार नाही. कारण या जिल्हय़ात निर्माण झालेले शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी तसे फारसे प्रयत्न झाले नाहीत. शिवसेनेकडून वसमतचे आमदार जयप्रकाश दांडेगावकरही लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे अन्य पक्षात असताना अवसान गळालेले नेते भाजपमध्ये काय परिणाम घडवून आणतील, असा प्रश्न कॉंग्रेसचे नेते विचारत आहेत. मात्र, असे असले तरी कॉंग्रेसची स्थितीही तशी फार चांगली आहे असे नाही. खासदार सातव हे मतदारसंघात निवडणूक लढविणार की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे बघू नशीब आजमावून, असे भाजपमधील नेत्यांना वाटत आहे.

उस्मानाबाद मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत भाजपचे तसे चिन्हही लोकांना फारसे माहीत नव्हते. उस्मानाबाद नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मात्र भाजपच्या नेत्यांनी ताकद वाढवली. मात्र, ती लोकसभा निवडणुका जिंकण्याएवढी आहे का, याविषयी शंका घेतल्या जातात. शिवसेना नेत्यांना पाठबळ देत घेतली जाणारी भूमिका बदलून आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पुढाकार घेतला तरी डॉ. पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व असणाऱ्या जिल्हय़ात भाजपला राजकारण करणे तसे सोपे असणार नाही. शिवसेना भाजपच्या युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाटय़ाला असल्याने भाजपचे तशी ताकद मर्यादितच. त्यात स्वबळ दाखवून निवडणूक लढविणे तसे अवघडच. सेनेची ताकद जरी असली तरी सेना नेत्यांमध्ये गटबाजी खूप आहे. राष्ट्रवादीला विरोध असा उस्मानाबाद जिल्हय़ाच्या राजकारणाचा पोत असल्याने कॉंग्रेसचे नेतेही शिवसेनेला मदत करीत असत. या स्थितीमध्ये भाजपची तयारी तशी कागदी घोडय़ावरची असेच म्हणता येईल.

लातूरमध्ये मात्र भाजपने चांगलेच हातपाय पसरले आहेत. खासदार सुनील गायकवाड यांच्या विरोधात भाजपमधील एक गट नाराज असला तरी या जिल्हय़ात पालकमंत्री संभाजीपाटील निलंगेकर यांनी आता संपर्क वाढविला आहे. संघटन बांधले आहे. दुसरीकडे कॉंग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर युवा नेते अमित देशमुख यांच्यावरही कॉंग्रेसचा एक गट नाराज असतो. परिणामी भाजपला लातूर मतदारसंघ तसा पुरक म्हणता येईल, अशी स्थिती आहे. म्हणूनच चार जिल्हय़ांची आढावा बैठकही राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लातूरमध्ये घेतली.

नांदेड हा परंपरागत कॉंग्रेसचा गड. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची राजकारणावर पकड आहे. सहकारी संस्था, जिल्हा बॅंक, जिल्हा परिषद, महापालिकांमध्ये त्यांनी अजुनही भाजपला शिरकाव करू दिलेला नाही. लोहा मतदारसंघाचे आमदार प्रताप चिखलीकरांना हाताशी धरुन भाजपचे नांदेड जिल्हय़ात सुरू असणारे राजकारण तसे हातपाय पसरायला पुरक असले तरी निवडणूक जिंकण्यापर्यंतची ती तयारी ठरू नाही, असे भाजपचे नेतेच मान्य करतात. बहुतांश कॉंग्रेसचे नेते भाजपमध्ये आले. पण भाजपच्या राजकारणाची धाटणी या मतदारसंघात रजू शकलेली नाही. त्यामुळे अमित शहा यांनी ज्या मतदारसंघाचा आढावा घेतला त्या हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड मतदारसंघात भाजपचा फुगा टाचणी लावताच फुटू शकतो.