नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीची संपादन प्रक्रिया डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी जमिनीची संपादन प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

समृद्धी महामार्गामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यासाठी जगातील अनेक देश तयार असून, राज्यात मोठी दळणवळण क्रांती घडेल. सध्या सह-हिस्सेदारांच्या संमतीबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. या सह-हिस्सेदारांना नोटीसा देण्यात येणार आहेत. तर ज्या जमीनदारांनी या प्रकल्पासाठी संमती दिली आहे, अशा जमीनदारांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे ते म्हणाले.

गगराणी म्हणाले की, हंगामी बागायती जमीन कोणती याबाबत शासनाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. हे काम अत्यंत काळजीपूर्वक करण्यासाठी आवश्यकता भासल्यास उपविभागीय अधिकारी किंवा तहसिलदार यांचा अहवाल देखील मागवण्यात येईल. औरंगाबाद जिल्यातील ११३१ शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी संमती दिली असून ७० जणांची नोंदणी झाली आहे. तर जालना जिल्ह्यातील ५८९ शेतकऱ्यांनी या प्रकल्पास संमती दर्शवली असून १९ जणांची नोंदणी प्रक्रिया झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.