भाव घसरल्यामुळे शेतकरी चिंतेत चार दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मूग, उडदाची रास करण्याची घाई सुरू केली असून त्यामुळे बाजारपेठेत दोन्ही वाणांची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. बुधवारी मुगाची १० ते १२ हजार कट्टे तर उडदाची १० हजार कट्टे आवक होती. १ सप्टेंबरपासून हमीभावाने मूग खरेदी करण्याची घोषणा राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली होती. प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. बुधवारी मुगाचे भाव ४ हजार ३०० ते ४ हजार ८०० पर्यंतच होते. मुगाचा हमीभाव ५ हजार २२५ रुपये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गतवर्षी याच कालावधीत मुगाचा भाव ८ हजार रुपये िक्वटल होता. उडदाची आवक वाढल्यामुळे त्याचे भावही कमी झाले असून ६ हजार ७०० ते ६ हजार ८०० इतकाच भाव होता. गतवर्षी या कालावधीत १० हजार ते ११ हजार रुपये िक्वटल उडदाचा भाव होता. बाजारपेठेत आणखीन काही दिवस मूग व उडदाची आवक वाढेल असा अंदाज असून उडदाचे भाव ६ हजार रुपयांपर्यंत खाली येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील आठवडय़ात तूर व हरभरा या दोन्हीही वाणाचे भाव चांगलेच घसरले होते. त्यामुळे बाजारात भीती निर्माण झाली होती. मात्र पुन्हा दोन्ही वाणाचे १० रुपयाने भाव वाढले आहेत. तुरीचा भाव ६ हजार ८०० ते ७ हजार तर हरभऱ्याचा भाव ७ हजार ५०० रुपये इतका होता. तूर डाळीचे भाव ९५ ते १०५ रुपये इतके आहेत. मागील आठवडय़ात ते ८५ ते ९५ असे होते. डाळवर्गीय पिकांचे भाव यापेक्षा खाली उतरणार नाहीत याची दक्षता घेण्यासाठी सरकारने आता बाजारपेठेत हस्तक्षेप करण्याची गरज आहे. गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच मूग व उडदाचे उत्पन्न झाल्यामुळे बाजारपेठेत आवक वाढली. नेमके शेतकऱ्याकडे उत्पादन झाल्यावर त्याच्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याबद्दल शेतकऱ्यांत नाराजी आहे.