ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांची माहिती पाकिस्तानमधील ६८ टक्क्य़ांवरील नागरिकांना युद्धजन्य परिस्थिती नको असून त्यांनाही भारतीयांप्रमाणेच शांतता हवी आहे. दोन्ही देशांमध्ये सतत तणाव निर्माण करणारे प्रसंग निर्माण होत असतात. त्यात सुधारणा करायची असेल तर सकारात्मक संवादाचा सेतू बांधावा लागेल, असे प्रतिपादन करून मुंबई प्रेस क्लब आणि कराची प्रेस क्लब हे चर्चा घडवून आणण्यासाठी व्यासपीठ तयार करीत असतात, असे भारत-पाकिस्तान संबंधाचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी येथे सांगितले. येथील महात्मा गांधी मिशनचे वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालय व जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दर्पण दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या प्रसंगी काही ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कारही करण्यात आला. ‘भारत-पाक संबंध व पत्रकारांची संवेदनशीलता’ या विषयावर बोलताना देसाई म्हणाले,की पाकिस्तानमधील किती लोकांना भारता संबंधी शांतता हवी आहे, यावर एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ६८ टक्क्य़ांपेक्षा अधिक नागरिकांनी शांततेला प्राधान्य दिले. युद्ध नको म्हणून त्यांनी मत व्यक्त केले आहे. खरं वास्तव हे आहे. परंतु दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याचा बऱ्याचवेळा आभास निर्माण केला जातो. त्यामुळे अशा तणावपूर्ण विषयावरील वार्ताकन करताना पत्रकारांनी संवेदनशीलतेने विषय हाताळावेत, असेही ते म्हणाले. कार्यक्रमास एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनी केले. बाबूराव दुधगावकर यांच्या बासरीवादनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. या वेळी ज्येष्ठ पत्रकार शांताराम जोशी, सुभाषचंद्र वाघोलीकर, विद्याभाऊ सदावर्ते, संतोष महाजन, नागेश गजभिये, नागनाथ फटाले, आरिफ शेख, अरविंद वैद्य, अशोक उजळंबकर हे सत्कारमूर्ती होते.