औरंगाबाद :  पैठण तालुक्यातील ईसारवाडी येथे १६ जुलै रोजी सासरा व जावयाच्या कुटुंबातील वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. या मारहाणीत गंभीर जखमी झालेले शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य संतोष माळी यांचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. या घटनेची नोंद पैठण औद्योगिक पोलीस ठाण्यात झाली असून सहापैकी चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी दिली.

मृत पंचायत समिती सदस्य संतोष माळी यांनी त्यांच्या मुलीचा विवाह गावातीलच बाळू शिंदे याच्याशी तीन वर्षांपूर्वी केला होता.

मात्र माळी यांची मुलगी मूकबधिर असल्याने पतीसह घरातील इतर मंडळी त्रास देत होते. १६ जुलै रोजी संतोष माळी यांचा मुलगा सागर याला मुलीला घेऊन येण्यासाठी पाठवले होते. मात्र, त्यांनी तुझ्या आई-वडिलांना पाठव म्हणून सागरला परत पाठवले.  मात्र त्यानंतर माळी व बाळू शिंदे यांच्यात जोरदार भांडण सुरूझाले व माळी यांना नामदेव सावंत, गणेश सावंत, आकाश शिंदे, बाळू शिंदे, गोकुळ शिंदे, नागू शिंदे यांनी संगनमत करून संतोष माळीसह दत्तू माळी, अशोक माळी यांना लाठय़ा-काठय़ा व धारदार शस्त्राने मारहाण केली. यात संतोष माळी यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचा शुक्रवारी सकाळी औरंगाबादेत उपचारादरम्यान मृत्यू झाला.