गेल्या अडीच-तीन महिने दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्ह्य़ात तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात बरसात केली. त्यामुळे शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला. सोमवारीही दुपारी तासभर पावसाने दमदार बरसात केली.
गेले दोन दिवस उदगीर व शिरूर अनंतपाळ वगळता उर्वरित तालुक्यांत काही प्रमाणात पाऊस पडला. हा पाऊस तालुक्यांतर्गतही सर्वत्र सारखा नाही. प्रत्येक अर्धा किलोमीटर अंतराने पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. लातूर तालुक्यातील मुरुड मंडळात १६, चिंचोली बल्लाळनाथ १५, औसा तालुक्यातील किल्लारीत १७, रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव २७, निलंगा तालुक्यातील औरादमध्ये १२, जळकोट मंडळात ४५, चाकूर तालुक्यातील नळेगाव मंडळात ४५, अहमदपूर तालुक्यातील अंधोरी मंडळात ३८ तर अहमदपुरात २२ मिमी पाऊस झाला. सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्हय़ातील दहा तालुक्यांत सरासरी ७.०९ मिमी पाऊस झाला. या पावसाने जिल्हय़ाची सरासरी २४६.८६ मिमीवर पोहोचली. गेल्या २४ तासांत तालुकानिहाय पडलेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे,  कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे : लातूर ५.६३ (२१८.१५), औसा २.४३ (२३०.०४), रेणापूर ८.७५ (२७७.२५), उदगीर निरंक (२०६.९), अहमदपूर ११.३३ (२३३.६५), चाकूर १२.८० (२३२), जळकोट २२.५० (३३१.५), निलंगा ४.१३ (२३९.४५), देवणी ३.३३ (२०७.९६), शिरूर अनंतपाळ निरंक (१९१.६५).