औरंगाबाद : औरंगाबादहून पोलिसांना चकवा देत सोलापूरच्या दिशेने नेण्यात येणाऱ्या १४ उंट असलेला ट्रक उस्मानाबादजवळील येडशी भागात शुक्रवारी रात्री पकडण्यात आला होता. ट्रक पुन्हा शहरात आणून बेगमपुरा परिसरातील एका गोशाळेत उंटांना ठेवण्यात आले होते. प्रवासाने दुखापत झालेल्या उंटांपैकी दोन दिवसांत चार उंट दगावले. सोमवारी आणखी तीन उंटांचा मृत्यू झाल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय कार्यालयाचे सहायक आयुक्त डॉ. गोविंद पांडे यांनी दिली. राजस्थान ते हैदराबादपर्यंतच्या प्रवासात उस्मानाबादजवळून पुन्हा औरंगाबादपर्यंतचा प्रवास व उंच मानांमुळे एकाच वाहनात झालेली कोंडी, यातून उंट जखमी झाले होते. त्यांना निमोनिया, छातीत संसर्ग झालेला होता.

उर्वरित सात उंटांपैकी चार जणांवर उपचार सुरू असून तीन उंट आता चालू शकत असल्याचेही डॉ. पांडे यांनी सांगितले. दरम्यान, औरंगाबाद शहरातील सातारा-देवळाई पोलिसांना दोन ट्रकमधून उंटांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. एक ट्रक सोलापूरच्या दिशेने निघालेला होता. एक अन्य मार्गाने हैदराबादकडे जात होता. त्यातील एक ट्रक पकडण्यासाठी पोलीस रवाना झाले असता चालकाने गुंगारा देऊन ट्रक सोलापूरच्या दिशेने पळवला. याची माहिती उस्मानाबाद पोलिसांना देण्यात आली. उस्मानाबाद पोलिसांनी येडशीजवळील टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री चौदा उंट असलेला ट्रक अडवला. बेगमपुरा भागातील पारसिंग पुरा येथील एका गोशाळेत उंटांना ठेवण्यात आले होते. तेथे जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय कार्यालयाचे सहायक आयुक्त डॉ. गोिवद पांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उंटांवर उपचार सुरू केले होते. त्यात शनिवारी सकाळी दोन, रविवारी दोन व सोमवारी तीन असे तीन दिवसांत सात उंट मृत झाले आहेत, असे डॉ. पांडे यांनी सांगितले.