बिपीन देशपांडे, लोकसत्ता

औरंगाबाद : औरंगाबाद ग्रामीण पोलीस विभागातील ३९ पोलीस शिपाईपदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी तब्बल ५ हजार ७२५ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यात एक बीएचएमएस एमडी डॉक्टरसह ४० अभियंते, वकील, एमबीए आदी १ हजार ६६१ उच्चशिक्षित उमेदवारांचा समावेश आहे.

औरंगाबाद ग्रामीण पोलीस मुख्यालयामागील मैदानावर सध्या पोलीस शिपाईपदासाठी धावण्यासह शारीरिक चाचणीची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस शिपाईपदासाठी अर्ज करण्याची किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण आहे. मात्र, या भरतीसाठी उच्चशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे. या भरती प्रक्रियेत अन्य उच्चशिक्षितांसह एलएलबी, एलएलएमची पदवी घेतलेल्या दोन उमेदवारांनीही अर्ज केले आहेत. सुरक्षित नोकरी प्राप्त करून भविष्यात मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून उच्चशिक्षितांनी अर्ज केल्याची शक्यता एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने वर्तवली.

पोलीस शिपाईपदासाठी १२ महिलांचीही भरती करण्यात येणार असून, त्यासाठी दीड हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत. भरती प्रक्रियेसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्यासह सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक, ९ सहायक पोलीस निरीक्षक, १७ पोलीस उपनिरीक्षक, १३५ पोलीस अंमलदार काम पाहात आहेत.

पोलीस शिपाईपदासाठीच्या भरती प्रक्रियेत एक बीएचएमएस एमडी, एमई, बीई असे अनुक्रमे ३ आणि ३७ मिळून ४० अभियंते, २५ बी.टेक, १५ एमबीए उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने भरती प्रक्रिया सुरू आहे.

मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक.

औरंगाबादमधील एका महाविद्यालयात बी. टेकच्या तृतीय वर्षांत शिक्षण घेत आहे. कंपन्यांमधून महाविद्यालयात आयोजित नोकरी मेळाव्यातही (कॅम्पस) नोकरीच्या संधी अनपेक्षितरीत्या उपलब्ध होत नाहीत. सुरक्षित भविष्याच्या उद्देशाने पोलीस शिपाईपदाच्या भरतीत सहभागी झालो.

यश, एक उमेदवार (बदललेले नाव)

अर्जदार उच्चशिक्षितांची संख्या

बीएचएमएमएस एमडी (०१), एम.ई. (०३), बी.ई. (३७),

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बी.टेक (२५), एमबीए (१५), बी.फार्मा (१४), बी. कॉम ( २०५) एम.कॉम (२७), एम.एस्सी (३५), एलएलबी-एलएलएम (०२), बीएस्सी अ‍ॅग्री (२६), बीएस्सी (४०७), बीबीए-बीसीए (४०), एमए (९५) बीए (७२९).