छत्रपती संभाजीनगर : तूर, मूग, हरभरा आदी डाळींच्या खरेदीमध्ये सध्या मंदी असून, ग्राहकांकडून उठाव नसल्याने दरही किलो मागे दहा ते पंधरा रुपयांनी घसरले आहेत.तुरीचे उत्पन्नही यंदा १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. २०२३-२०२४ च्या हंगामानुसार देशात ४०.०४ लाख हेक्टरमध्ये ३०.३४ लाख टन तुरीचे उत्पादन झाले आहे. तर महाराष्ट्रातील ११.११ लाख हेक्टरवर ८.८९ लाख टन उत्पादन झाले आहे.

जानेवारी ते मार्चदरम्यान, नवीन तूर बाजारात दाखल होते. यासह एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत डाळींसह गहू-ज्वारी आदी धान्यांचीही घरात साठवणुकीच्या दृष्टीने खरेदी केली जाते. यंदा मे महिन्याच्या मध्यातून सुरू झालेल्या पावसाळी वातावरणाने डाळींची खरेदी मंदावलेली आहे. आता जूनमध्ये गहू, ज्वारी व डाळींची खरेदी थांबलेली असते. पावसाळ्यात धान्याला कीड लागण्याचा धोका अधिक असल्याने सर्वसामान्य ग्राहक खरेदी करीत नाहीत, असे व्यापारी सांगतात.

मागील काही वर्षात तूरडाळीचे दर दीडशे रुपये किलोंवर होते. आता हेच दर डाळ कारखान्यांमधून निघणारे ठोक बाजारातील आहेत. हे दर ९२ ते १०२ रुपये किलोपर्यंत आहेत. मोंढ्यातील व्यापाऱ्यांकडे हेच दर १०० ते १०५ रुपयांपर्यंत आहेत. हरभरा डाळीचे दर ६७ ते ६८ रुपयांपर्यंत आहेत. तर मूगडाळीचे दर १०० ते ११० रुपये किलोपर्यंत आहेत. पावसाळ्यामुळे हरभरा डाळीचे दर किंचित पुन्हा वाढले आहेत, असे मोंढ्यातील व्यापारी सुभाऊ देवरा यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा तूरडाळीचे उत्पादनही वाढले आहे. सरकारकडून डाळवर्गीय पिकांची खरेदी बंद आहे. शिवाय यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाळी वातावरण सुरू झाले आहे. पावसाळ्यात धान्याची खरेदी तशी होत नाही. यापुढील काळात आफ्रिकेतूनही तूर डाळ केंद्र सरकारच्या आयात धोरणानुसार येईल. त्याचाही दर ठोक बाजार दरानुसार ६० ते ६५ रुपयांपर्यंत असेल. श्रेणिक मुनोत, डाळ मिल उद्योजक.