Chhatrapati sambhajinagar Robbery Case : छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खोतकर पोलीस चकमकीत ठार झाला आहे. तसेच या प्रकरणातील सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी २० तोळे सोनं जप्त केलं आहे. परंतु, दरोड्यात साडेपाच किलो सोनं आणि ४० किलो चांदी चोरीला गेली होती. त्यमुाळे उरलेला मुद्देमाल कुठे गेला असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच संतोष लड्डा यांनी इतकी संपत्ती कशी मिळवली असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, लड्डा यांनी स्वतः यावर भाष्य केलं आहे.
संतोष लड्डा म्हणाले, “पोलिसांनी नेमकं किती तोळे सोनं जप्त केलंय त्याची मला माहिती नाही. मात्र १९ ते २० तोळे सोनं मिळालं असल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलीस प्रामाणिकपणे तपास करत आहेत. माझं गेलेलं सोनं त्यांनी मला परत मिळवून द्यावं एवढीच माझी इच्छा आहे. मी ३० वर्षे कष्ट करून ही संपत्ती मिळवली आहे. माझी गेलेली संपत्ती मला मिळावी असं मला वाटतंय”. लड्डा यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली.
संतोष लड्डा यांच्याकडे इतकं सोनं आलं कुठून?
लड्डा यांना विचारण्यात आलं की त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं कुठून आलं? त्यावर त्यांनी सांगितलं की “मी वयाच्या २१ व्या वर्षापासून काम करतोय. ती माझी ३० वर्षांची कष्टाची कमाई आहे. माझ्या पत्नीला सोन्याचे दागिने परिधान करण्याचा छंद आहे. तिच्यासाठी हे सोनं घेतलं होतं. सर्व सोनं मी कायदेशीर मार्गाने खरेदी केलं आहे. माझ्याकडे त्याचे कागदपत्र देखील आहेत”. त्यानंतर लड्डा यांना विचारण्यात आलं की तुमचा कोणावर संशय आहे का? यावर ते म्हणाले, “जे लोक माझ्याबरोबर आहेत ते अनेक वर्षांपासून काम कत आहेत. माझा कोणावरही संशय नाही. पोलीस तपासांत खरा गुन्हेगार समोर येईलच”.
संतोष लड्डा म्हणाले, “मी पोलिसांनी एवढंच सांगेन की त्यांनी माझं चोरीला गेलेलं सोनं आणि इतर संपत्ती रिकव्हर करून द्यावी. त्यासाठी गरज असल्यास आणि शक्य असल्यास त्यांनी आणखी ताकद लावावी, पोलसी पथकं वाढवावी”.