मराठवाडय़ातील लोकप्रतिनिधी हक्काच्या पाण्याच्या बाबतीत गंभीर नाहीत. त्यांना अधिक माहिती देऊन या लढय़ाला आकार देण्यासाठी येत्या रविवारी म्हणजे १ नोव्हेंबर रोजी एक विशेष बठक घेण्याचे ठरविण्यात आल्याचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले. १२.८४ टीएमसी नाही तर त्यापेक्षा अधिक म्हणजे १९ टीएमसी पाणी ऊध्र्व भागातून मिळणे आवश्यक होते. मात्र, देण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करवून घेण्यासाठी एकजूट आवश्यक असल्याचे बंब यांनी सांगितले.
मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी दारणा या चार धरण समूहातून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाच्या संचालकांनी दिल्यानंतर त्या विरोधात नगर व नाशिक जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर अद्यापि निर्णय झालेला नाही. मात्र, नगर व नाशिक जिल्ह्यात आंदोलने सुरू झाली आहेत. सेना, काँग्रेस या दोन्ही पक्षातील नेते मराठवाडय़ात आले की इकडच्या बाजूने  आणि तिकडे गेले की तिकडच्या बाजूने वक्तव्य करीत असल्याचे वातावरण आहे. मराठवाडय़ातून मात्र या प्रश्नी लोकप्रतिनिधी फारसे आक्रमक नसल्याचे दिसून येत आहे. या पाश्र्वभूमीवर आमदार बंब यांनी पत्रकार बठक घेऊन लोकप्रतिनिधींची बठक घेणार असल्याचे जाहीर केले. खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष यांना या बठकीला आमंत्रणे दिल्याचे त्यांनी सांगितले. येत्या रविवारी दुपारी २ वाजता ही बठक औरंगाबादमध्ये होणार असल्याचे बंब यांनी सांगितले.
नगर व नाशिकमध्ये सुमारे ४८ टीएमसी पाण्याची धरणे अनधिकृत असल्याने ती पाडली जावीत या भूमिकेवर ठाम असल्याचेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. उपकार म्हणून पाणी सोडण्याची भूमिका आता वरच्या मंडळींनी सोडावी. समन्यायी पाणी वाटपाची भूमिका त्यांनी स्वीकारावी, असे आवाहनही बंब यांनी केले.