छत्रपती संभाजीनगर – लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे असून, हे मंडळ नियोजन खात्याशी जोडावे, असे माजी मंत्री धनंजय मुंडे यांंनी आपल्याला सूचवले आहे. धनंजय मुंडे यांनीही सामाजिक न्याय विभागाचे मंत्रिपद सांभाळलेले असल्याने त्यांच्या सूचनेचा विचार केला जाईल. परंतु, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विद्यमान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याशीही बोलावे लागेल, असे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते बीड येथे गुरुवारी आयोजित ऊसतोड कामगारांसाठी आयोजित मेळावा आरोग्य तपासणी शिबिरात बोलत होते. यावर आपल्या वक्तव्यावरून कायम चर्चेत येणारे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट काय भूमिका घेतात, हे पाहणे औौत्सुक्याचे ठरेल.

पवार म्हणाले, ऊसतोड कामगारांचा काम करताना मृत्यू झाल्यास पाच लाखांची मदत देणारी सानुग्रह अनुदानाची योजना ऑक्टोबर २०२४ पासून राबवली जाते. यातील रक्कम १० लाख करावी, तर अपंगत्व आल्यास देण्यात येणाऱ्या अडीच लाखांची रक्कमही दुप्पट म्हणजे पाच लाख करावी, असे धनंजय मुंडे यांनी सूचवले असून, त्यादृष्टीनेही सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही पवार म्हणाले. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी २२ वसतिगृह मंजूर असून, त्यातील १६ सुरू झालेली आहेत. या मुलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनेही इनोव्हेशन व इन्क्यूबेशन सेंटर २०० कोटी रुपये उभारून सुरू केले जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर हे आमदारही यावेळी उपस्थित होते.

प्रत्येक जिल्ह्यात विमानांसाठी धावपट्टी

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ तयार करण्याचा विचार आहे. त्यासाठी धावपट्टीही करावी लागणार आहे. त्यासाठी गुरुवारीच केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी आपले बोलणे झाले असून, विकास आराखड्याचे ४१ लाख रुपये अदा केल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. बीडमध्येही विमानतळ करण्याची घोषणा यापूर्वीच आपण केलेली आहे. त्यादृष्टीनेही कामकाज सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बीडहून १७ सप्टेंबर रोजी रेल्वे ?

परळी-बीड-अहिल्यानगर या रेल्वेमार्गाचे कामकाज प्रगतीपथावर आहे. त्यातील बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्ग पूर्ण झालेला असून, त्यावरून चाचणीही झालेली आहे. यासंदर्भाने बोलताना पालकमंत्री अजित पवार म्हणाले, येत्या १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या दिवशी बीडहून अहिल्यानगरपर्यंत रेल्वे सुरू करण्याचा विचार सुरू असून, त्यासाठी गुरुवारीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलणे झाले आहे. पुढे हीच रेल्वे मुंबईपर्यंत नेण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.