छत्रपती संभाजीनगर : वनविभागाची परीक्षा देऊन राहत्या रूमकडे परतणाऱ्या तीन बहिण भावंडांचा हायवाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास बीड वळण रस्त्यावरील बाळापूर फाट्याजवळील एका हॉटेल समोर घडली. प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे व लखन अंभोरे अशी मृतांची नावे असल्याची माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकांत दरवडे यांनी दिली.

झाल्टा फाट्याकडून तिघेही बहिण-भावंडं बाळापूर परिसरातून सातारा-देवळाई भागात असलेल्या रूमकडे परतत होते. सकाळीच वनविभागाच्या परीक्षेशी संबंधित मैदानी चाचणी देण्यासाठी तिघेही भावंडे दुचाकीवरून गेलेले होते. परतत असताना बाळापूर फाट्याजवळ एक हायवा ट्रक खडी-कच टाकून धूळ उडवत ओव्हरटेक करत सुसाट निघाला होता. मात्र पुढे जाताना अंभोरे भावंडांच्या दुचाकीला धडकला. दुचाकीवरील भावंडे रस्त्याच्या एका बाजूने निघालेले असतानाही मागून येऊन हायवा धडकल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा : अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; चार हायवा, दोन जेसीबीसह २ कोटी ८० लाखांचा मुद्देमाल जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनास्थळी वनविभागाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आदी साहित्य विखरून पडले होते. प्रवेशपत्रावरून पोलिसांना मृतांचा पत्ता मिळून आला. मृतांच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार अंभोरे भावंडे हे जिंतूरचे असून येथे सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगरमधील एका हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या भागात राहायला होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, तिन्ही भावंडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवून चिकलठाणा पोलिसांनी अपघाताची नोंद केली.