लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर येथील सिंचन योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लाभार्थीना वाटप करण्यात येणाऱ्या साहित्याची पळवापळवी करण्यात आली. सभा मंडपात मागच्या बाजूला ओढाओढी करत अनेकांनी सामान पळविले. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. अखेर त्या साहित्याचे वाटप होणार आहे, शांत बसा असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांना करावे लागले.

या वेळी भाषणातून मराठवाडय़ाचा दुष्काळ दूर करण्याची घोषणा त्यांनी केली. गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी आयोजित केलेल्या जाहीर कार्यक्रमात वाटप करण्यात येणार असलेले वेगवेगळे किट लोकांनी पळवले. विशेषत: ज्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला उभे राहिले, त्याचवेळी हा प्रकार घडला.

फडणवीस यांनी आपल्या भाषणात सर्वाना शांत खाली बसायचे आवाहन केले. मात्र तरी देखील एका बाजूला सामान पळवले जात होते. याआधी देखील गंगापूर तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात असाच प्रकार घडला होता.

हेही वाचा >>>“मुंबई हृदयसम्राट कोण?” आशिष शेलारांनी प्रश्न विचारताच भाजपाच्या ‘या’ नेत्याचं नाव आलं समोर!

 या वेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले ‘गोदावरी खोऱ्यात अन्य खोऱ्यातून पाणी आणण्याची योजना तयार केली होती. मात्र, नंतर सरकार नसल्याने ती योजना गुंडाळली. ठाकरे सरकारने वॉटर ग्रीड योजनेची हत्या केली. मात्र आपण आता ती मंजूर केली. सिंचनासाठी पैसे मिळवून दिले, सिंचनाच्या कामाला गती दिल्याने अनेक गावांसाठी सिंचनाचा लाभ मिळेल अशी योजना आखली. मागील दीड वर्षांत अनेक प्रकल्पांना मान्यता दिली. जगतिक बँकेकडून सांगली, कोल्हापूरमधून वाहून जाणारे पुराचे पाणी मराठवाडय़ाला आणण्यासाठी केंद्राने आणि जागतिक बँकेने मान्यता दिली आहे. जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला असल्याने सिंचनाचा फायदा होईल असे फडणवीस म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 लहान मुलांना शाळेत निबंध देतात, ‘मी शास्त्रज्ञ झालो तर,’ अशीच वक्तव्य एक माणूस रोज करत आहे -‘ मी मुख्यमंत्री असतो तर..’  अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना घरात बसून राहिले. काहीच केले नाही. आता घरात बसून निबंध लिहा, लोकांच्या कामाचे आम्ही पाहू अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या याचिकेच्या प्रकरणावर अभ्यासपूर्ण निकाल दिल्याचेही त्यांनी सांगितले.