स्वतंत्र मराठवाडय़ाची भूमिका घेऊन स्थापन करण्यात आलेल्या मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या वर्धापनाच्या कार्यक्रमास मंगळवारी व्यासपीठावर पाच आणि सभागृहात २५ अशी उपस्थिती होती. छोटय़ा राज्यांचा लवकर विकास होतो, असे सांगत प्रा. बाबा उगले यांनी हा मंच स्थापन केला आहे. या मागणीला पुढे रेटण्यासाठी राज्याचे माजी महाअभियोक्ता श्रीहरी अणे यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना मंगळवारी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ते औरंगाबादला आलेच नाहीत.

शिवसेनेकडून स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या मागणीला विरोध असल्याने मौलाना आझाद रीसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमाकडे लोकांनी पाठ फिरवली. जे. के जाधव, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, गणेश चौधरी व  अ‍ॅड. प्रदीप देशमुखसह पाचजण व्यासपीठावर आणि मोजून २५ जण सभागृहात असे चित्र होते. स्वतंत्र मराठवाडा राज्य झालेच पाहिजे अशा घोषणा कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी देण्यात आल्या. तेलंगणा, उत्तराखंड या प्रदेशाची प्रगती स्वतंत्र राज्यनिर्मितीनंतर झाल्याचा दावा या वेळी प्रा. उगले यांनी केला. ते म्हणाले, ‘पहिल्या कार्यक्रमात ‘कुटाणा’ झाल्याचा परिणाम दुसऱ्या कार्यक्रमावर दिसत आहे.’ शिवसेनेकडून श्रीहरी अणेंच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा संदर्भ त्यांच्या कुटाणा या शब्दाला होता. स्वतंत्र मराठवाडय़ाच्या मागणीला राजू शेट्टी यांचा पाठिंबा आहे काय, याची चर्चा आता सुरू झाली आहे. कार्यक्रमाच्या फलकावर तेच प्रमुख अतिथी असल्याचे म्हटले असल्याने त्यांची स्वतंत्र मराठवाडय़ाविषयी भूमिका काय, याची उत्सुकता लागली आहे.

या कार्यक्रमासाठी ४० पोलीस कर्मचारी आणि चार अधिकारी बंदोबस्तास होते. तेवढेही कार्यकर्ते सभागृहात नव्हते. त्यामुळे स्वतंत्र मराठवाडय़ाचे मोजकेच समर्थक असे चित्र दिसून येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.